कृषी विभागाच्या अहवालावर शेतकऱ्यांचा विश्‍वासच बसेना 

कळमेश्‍वर : अतिपावसामुळे वाळलेले सोयाबीन व पिवळी पडलेली पऱ्हाटी.
कळमेश्‍वर : अतिपावसामुळे वाळलेले सोयाबीन व पिवळी पडलेली पऱ्हाटी.

कळमेश्‍वर (जि.नागपूर)  : सावनेर व कळमेश्‍वर तालुक्‍यात सतत दोन महिन्यांपासून होत असलेल्या पावसामुळे अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे कृषी विभागाने केलेल्या सर्व्हेमध्ये नुकसानाचा आकडा कमी आहे. यासोबतच शेतपिकांच्या नुकसानाचा अंदाज नगण्य असल्याने शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणार कशी, असा सवाल शेतकरी करीत आहेत. 
दोन्ही तालुक्‍यांत 6 व 18 सप्टेंबरला अतिवृष्टी झाली. अनेकांचे नुकसान झाले. कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार, सावनेर तालुक्‍यात कापसाचे 392 हेक्‍टरमध्ये, तुरीचे 70.8 हेक्‍टर तर इतर पिकांचे 9 हेक्‍टरमध्ये नुकसान झाले. तालुक्‍यात 68 घरांची पडझड व नुकसान झाले आहे. कोथुळणा येथे घरांत पाणी सिरले व जनावरेही पुरात वाहून गेली. त्याचप्रमाणे 17 सप्टेंबरच्या अतिवृष्टीमध्ये तालुक्‍यात 9 हजार 197.5 हेक्‍टरमधील पिकांचे 33 टक्‍क्‍यांपेक्षा कमी नुकसान झाल्याची नोंद केली आहे. कळमेश्‍वर तालुक्‍यात पिकांचे व घराचे नुकसान झाले. तालुक्‍यात 18 सप्टेंबरच्या अतिवृष्टीमध्ये प्राथमिक अंदाजानुसार पाच गावांत 99 हेक्‍टरचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने नोंदविली आहे. तालुक्‍यात झालेल्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले असून पिकांची वाढ खुंटली आहे. शेतीची कामे अडकून पडली आहेत. शेतकरी पावसामुळे हैरान झाला आहेत. शेतमजुरांच्या हातालादेखील काम शिल्लक नाही. जास्त पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजुरांना उदरनिर्वाहाचा प्रश्‍न पडला आहे. मात्र, सरकारी विभागाने नोंदविलेली आकडेवारी ही परिस्थितीशी मिळतीजुळती नसल्याने त्यांच्या अहवालावर शेतात राबणारा शेतकरी प्रश्‍न करीत आहेत. 
अतिवृष्टीचा असाही परिणाम 
जाणकार शेतकऱ्यांच्या मते, त्यांच्या जीवनात अद्याप सातत्याने दोन महिने चालणारा पाऊस प्रथमच अनुभवास येत आहे. यामुळे पिकांवर दुष्परिणाम झालाच आहे. शिवाय रोगराई पसरली आहे. दूषित पाण्यामुळे जनावरे दगावली असून, त्यांच्यावर अनेक रोग आले आहेत. नागरिकांना दूषित पाण्यामुळे विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

 सरकारने सावनेर व कळमेश्‍वर तालुक्‍यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अन्यथा शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय नाही. शेती व्यवसाय धोक्‍यात आला आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी सुनील केदार यांच्या नेतृत्वात एसडीओंना निवेदन देणार आहोत. 
-मनोहर कुंभारे, माजी जि. प. विरोधी पक्षनेते
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com