अमरावती : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना येत्या पंधरवड्यात मिळेल, अशी अपेक्षा महिला व बाल कल्याण मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गुरुवारी (ता. 21) खरिपाच्या राज्यस्तरीय बैठकीचा आढावा घेतला. या बैठकी पश्चात श्रीमती यशोमती ठाकूर यांनी उपरोक्त माहिती दिली. बैठकीत अनेक मुद्यांवर गांभीर्याने चर्चा झाली. त्यामध्ये अमरावती सह राज्यातील आठ जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे रखडलेल्या कर्जमुक्ती योजनेच्या विषयी चर्चा करण्यात आली.
यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात संवाद होत आहे. कर्जमाफी पूर्ण होईस्तोवर आगामी खरिपासाठी पात्र शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज देण्यात यावे, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केलेली आहे. भारतीय रिझर्व बॅंकेतर्फे यासंदर्भात येत्या काही दिवसांत मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या जातील. त्या आधारे कर्जमाफी व कर्ज वाटप प्रक्रिया राबविली जाईल, असे याप्रसंगी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
अमरावती जिल्ह्यातील 1 लाख 31 हजार शेतकऱ्यांची माहिती विविध बॅंकांतर्फे पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यात बिजूधावडी (ता.धारणी) आणि वरा (ता. तिवसा) येथील कर्जमुक्तीच्या याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. फेब्रुवारीपासून ही प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे खरिपासाठी शेतकऱ्यांना पीक कर्जाचा प्रश्न उपस्थित झालेला आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.