file photo
file photo

म्हणून लागल्या कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या रांगा...वाचा

वर्धा : विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी कापसाची लागवड करतात. मात्र, मागील काही वर्षांपासून त्यांना नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. कापसावर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केले. त्यामुळे उत्पादनात घट होऊन त्याचा दर्जाही खालावला व कमी दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले.

परिणामी गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यात सर्वांत जास्त कापसाची लागवड करण्यात येते. यावर्षी शेतकऱ्यांनी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी फोरेमन ट्रॅप लावून कृषी विभागाच्या मदतीने बोंडअळीवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवण्यात यश मिळविले. त्यामुळे कापसाचे उत्पादनही बऱ्यापैकी हाती आले.

वर्धा जिल्ह्यात सीसीआयचे वर्धा, हिंगणघाट, वायगाव, देवळी, सेलू, समुद्रपूर, सिंदी रेल्वे, कांढळी आदी ठिकाणी खरेदी केंद्र आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी पणन महासंघ व खासगी व्यापाऱ्यांची खरेदी सुरू आहे. वर्धा जिल्ह्यात 31 जानेवारीपर्यंत सीसीआयतर्फे विविध खरेदी केंद्रांवर एक लाख क्विंटल कापसाची शासनाच्या आधारभूत दराने खरेदी करण्यात आली आहे.

ग्रेडवाईज मिळतो हमीभाव

सध्या सीसीआयचा ग्रेडवाईज 5 हजार 300 ते 5 हजार 550 रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल हमीभाव आहे; तर खासगी व्यापारी 5,200 ते 5, 300 रुपये प्रतिक्विंटल दराने कापसाची खरेदी करीत आहेत. वर्धा तालुक्‍यात सीसीआयच्या उमरी व वायगाव केंद्रात 32 हजार क्विंटल; तर इतर पाच खासगी केंद्रांवर 38 ते 40 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला.

सीसीआयकडून पैसे मिळण्यास विलंब

सीसीआयमार्फत शेतकऱ्यांना कापूस विक्री केल्यानंतर पैसे मिळण्यासाठी किमान 15 ते 20 दिवसांचा कालावधी लागतो. दुसरीकडे खासगी व्यापाऱ्यांना विक्री केल्यास रोख पैसे मिळतात. त्यामुळे सीसीआयचा दर जास्त असला; तरी शेतकरी पैशाची गरज असल्याकारणाने कमी दरामध्ये खासगी व्यापाऱ्याला कापसाची विक्री करून मोकळा होतो. परिणामी, कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

कसं काय बुवा? : दारू गाळण्यासाठी अशी लढवली शक्‍कल

काळवंडलेला कापूस घेण्यास नकार

यावर्षी जिल्ह्यात अवकाळी पावसाने अनेकवेळा हजेरी लावल्याने त्याचा कापूस उत्पादकांना फटका बसला. बऱ्याच शेतकऱ्यांचा कापूस पावसाने भिजल्याने काळवंडला. त्यामुळे असा कापूस खरेदी करण्यास नियमावर बोट ठेवून सीसीआयकडून नकार दिला जातो. परिणामी, शेतकऱ्यांना नाइलाजाने कमी भावामध्ये खासगी व्यापाऱ्याला कापूस विक्री करावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com