"मुख्यमंत्री साहेब, फक्त बारा तास वीज द्या"; रात्री जीव मुठीत घेऊन करावं लागतं सिंचन; मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांची मागणी 

farmers seek for starting supply of electricity at night hours to udhhabv Thackeray
farmers seek for starting supply of electricity at night hours to udhhabv Thackeray

दिग्रस (जि. यवतमाळ) : खरिप हंगामातून शेतकऱ्यांनी केलेला लागवडीचा खर्च निघाला नाही. त्यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात पेरणी केली. शेतातील विहिरीला पाणी असले तरी विज वितरण कंपनीकडून नियमित वीजपुरवठा सुरळीत सुरू राहत नाही. पीक जगविण्यासाठी जीव मुठीत घेऊन शेतकऱ्यांना रात्रीचे सिंचन करावे लागत आहे. फक्त बारा तास वीजपुरवठा देण्यात यावा, अशी आर्त विनवणी दिग्रस तालुक्‍यातील शेतकऱ्याने सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

वीजवितरणकडून कृषीपंपासाठी शेतकऱ्यांना फक्त रात्रीच वीजपुरवठा करण्यात येत असल्याने रात्रीच्या काळोखात शेतकऱ्यांना जीवमुठीत घेऊन पिकाला पाणी द्यावे लागत आहे. दिग्रस तालुक्‍यातील मांडवा येथील शेतकरी अशोक गादेवार यांनी बारा तास वीजपुरवठा करण्याची मागणी चांगलीच चर्चेत आली आहे. 

वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना रात्री रात्री साडेअकरा ते सकाळी साडेसात वाजेपर्यंत वीज दिली जाते. दिवसभर शेतात काम करून शेतकरी थकतात. त्यानंतर रात्री पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. थंडीत पाण्यात उभे राहून ओलीत करावे लागते. शेतकऱ्यांची होणारी घालमेल शब्दात व्यक्त करता येत नाही.

"शेतकऱ्यांबद्दल सरकारला एवढी चीड का आहे, आम्ही रात्रभर का जागं राहायचं, ज्यांनी कुणी हा निर्णय घेतला असेल ते आम्हाला वैरी समजत असतील', अशी व्यथा गादेवार यांनी मांडली आहे. रात्री शेतीला वीजपुरवठा दिला जातो. डीपीवरील फ्यूज गेला तर तो टाकण्यासाठी रात्रीचे कर्मचारी मिळत नाही. शेतकऱ्यांनाच जीव धोक्‍यात टाकून फ्युज टाकावे लागतात. 

येवढं करून आमच्या हातात काय पडतय, असा प्रश्‍नही शेतकऱ्याने विचारला आहे. सत्ता परिवर्तनानंतर फरक पडेल, अशी अपेक्षा होती. मात्र, हाती निराशाच आल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी दखल घेवून न्याय द्यावा, अशी मागणी गादेवार यांनी केली आहे.

साहेब, बायको टॉर्च देते

साहेब, रात्री घरातून बाहेर निघालो तर आई म्हणते भाऊ बुट घातले का, बायको टॉर्च देते. वडील म्हणतात काठी घेतली का? मी येतो तुझ्या बरोबर. रात्री साप, विंचू, बिबट्यासारखे संकटे असतात. मी शेतात अंधारात असताना कुटुंबातील सदस्यांना झोप लागत असेल काहो.शेतकऱ्यांना दिवसा किमान बारा तास वीजपुरवठा देण्यात यावा, अशी अपेक्षा शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com