नागपूर : नवीन वाहतूक कायद्यावरून सोशल मीडियावर टीकाटिप्पणी होत आहे. परंतु वस्तुस्थितीशी सुसंगत नाही. कायद्यामुळे लोकांचे प्राण वाचतील, अशी भूमिका आहे. कायदा मोडला नाही तर दंडच होणार नाही, असे नमूद करीत केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी कायद्याची भीती आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. या कायद्यामुळेच गेल्या आठ दिवसांत वाहतूक परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात गर्दी होऊ लागली, असेही ते म्हणाले.
श्री दक्षिणामूर्ती स्वयंसेवक गणेशोत्सव मंडळातर्फे महाल येथील चिटणीस पार्कवर आयोजित प्रकट मुलाखतीत ते बोलत होते. निवेदिका रेणुका देशकर आणि ज्येष्ठ पत्रकार बाळ कुळकर्णी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विविध विषयांवर बोलते केले. नव्या वाहतूक कायद्याची भीती बाळगण्याचे कारण नाही, असे नमूद करीत गडकरी म्हणाले, प्रत्येकाने "वाहन' नावाचे ऍप डाउनलोड करून मोबाईलमध्ये वाहन परवाना, वाहनाची कागदपत्रे ठेवावी, ती पोलिसांना दाखवावी, एवढे साधे काम आहे. पोलिसांच्या भीतीपोटी अपघातग्रस्तांना मदत केली जात नव्हती. आता पोलिस अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना त्रास देणार नाही, असा कायदाच केला. मीही दंड भरला आहे, मुख्यमंत्र्यांनीही दंड भरला आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये नियम मोडताना दिसले की स्वयंचलित पद्धतीने चालान तयार होते व ती घरपोच येते. त्यामुळे पोलिसांना भ्रष्टाचाराची संधीही नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी गोरगरिबांची कामे करीत असल्याने त्यांचा आशीर्वाद काम करण्याची प्रेरणा देत असल्याचे ते म्हणाले. राजकारणावर बोलताना ते म्हणाले, काही चांगल्या परंपरा आहेत, त्या शिकायला हव्या. जॉर्ज फर्नांडिस, गोळवलकर गुरुजी यांच्याकडून बरेच चांगले घेण्यासारखे आहे. पक्ष बदलणारे इतिहास घडवित नाहीत. ए. बी. बर्धन यांचा विचाराशी प्रामाणिकपणा आवडतो. राजकारणात चांगले, वाईट दिवस येतील. आपण चालत राहायला हवे, संयम ठेवायला हवा, असे नमूद करीत त्यांना "आयाराम-गयाराम' यांचे पुन्हा एकदा कान टोचले. |
|