Video : यवतमाळमधील शेतकऱ्यांसमोर प्रश्न; घरचं बियाणं 'उगवलं', प्रमाणित 'कुजलं'...

Insect infestation did not result in seed germination
Insect infestation did not result in seed germination
Updated on

यवतमाळ : राज्यातील हजारो हेक्‍टरवरील सोयाबीन पिकाची पेरणी उलटली आहे. मात्र, कृषी विभाग व बियाणे कंपन्या हा "कलंक' निसर्गाच्या माथी मारत आहेत. शंभर मिमि. पाऊस पडण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी पेरणी केली, किडीचा प्रादुर्भाव झाल्याने बियाणे उगवले नाही, असा जावईशोध कृषी शास्त्रज्ञांकडून लावला जात आहे. मात्र, निसर्गानेच पुरावा सादर केल्याने आता त्यांचीही "बोबडी' बंद झाली आहे.

धुऱ्याच्या एका बाजूच्या शेतात घरचे बियाणे पेरले ते शंभर टक्के उगवले. तर, त्याच धुऱ्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या शेतात प्रमाणित केलेले बियाणे पेरले, परंतु ते उगवलेच नाही. त्यामुळे कृषी शास्त्रज्ञाना येथे मात्र कोणतीही सबब सांगता आली नाही. नुकसान मात्र शेतकऱ्याचे झाले. त्याचे वर्षभराचे तास साधले नाही. याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

शेती व्यवसायात पेरणीला फार महत्त्व आहे. तास साधले की शेतकरी आनंदीत होतो. हमखास पीक येण्याचे ते पहिले लक्षण आहे. तासच साधले नाही, तर मात्र त्याच्यावर संकटांचा डोंगर कोसळतो. यंदा हा डोंगर बनावट सोयाबीन बियाण्यांमुळे कोसळला आहे. संपूर्ण विदर्भातच बनावट सोयाबीन बियाणे विकले गेले. तर, एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील 50 हजार हेक्‍टरवरील सोयाबीनची पेरणी उलटल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. याबाबत 'सकाळ'ने सतत पाठपुरावा केल्याने आज कृषी विभागाचे अधिकारी काही भागात पंचनामा करताना दिसून आले.

पुसद तालुक्‍यातील पुसद खंड दोनमध्ये मोहा शेतशिवारात आज कृषी अधिकाऱ्यांनी बांड गेलेल्या शेतांची पाहणी केली. गजानन सखाराम भालेकर व राजेश सुधाकर भालेकर या दोन चुलत भावांचे शेत एका धुऱ्याने विभागले आहे. गजानन यांनी चार एकरांपैकी तीन एकरांत गेल्या वर्षी राखून ठेवलेले घरचे बियाणे पेरले व एका एकरात महाबजीचे 9305 हे बियाणे पेरले. घरचे बियाणे शंभर टक्के उगवले. त्यात टोब आली नाही. मात्र, एका एकरातील बियाणे उगवलेच नाही. तर, त्यांच्या धुऱ्यालाच लागून राजेश भालेकर यांचे आठ एकर शेत आहे. त्यांनी आठ एकरात आठ बॅग प्रमाणित केलेले सोयाबीन बियाणे पेरले. ते उगवलेच नाही. त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट कोसळले आहे. ही बाब शेतकऱ्यांनी उपस्थित कृषी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. पुसद येथील हटकेश्‍वर वॉर्डात दोघेही भाऊ राहतात. राजेश भालेकर यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवरच चालतो. ते स्वत: अपंग आहेत.

त्यांच्या एका हाताला पोलिओ असल्याने ते अंगमेहनतीची कामे करू शकत नाहीत. त्यांनी पेरणीसाठी बॅंकेचे पीककर्ज घेतले. त्यातून पेरणी केली. आता मात्र, दुबार पेरणीसाठी त्यांच्याकडे पैसा नाही. त्यामुळे शेतजमीन पडिक ठेवण्याची त्यांच्यावर वेळ आली आहे. कुटुंबाचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राजेश भालेकर यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. त्यांची तक्रारीवरून पंचनामा करण्यासाठी आलेल्या कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष बनावट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा पुरावाच बघितला. याबाबतचा अहवाल तयार करून शासनाला पाठविणार असल्याचे त्यांनी सांगितले.


नुकसानीच्या पाचपट भरपाई द्या
पुसद येथून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर मोहा शेतशिवारात राजेश सुधाकर भालेकर या अपंग शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन पिकाची पाहणी केली. त्यांचे आठ एकर शेतातील सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. मात्र, त्यांच्या शेजारीच त्यांच्या चुलत भावाचे शेत आहे. त्यांनी घरचे लावलेले बियाणे उगवले. घरचे बियाणे उगवले मात्र सर्टिफाईड बियाणे उगवले नाही. त्यामुळे ज्यांनी बियाणे सर्टिफाईड केले त्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. तसेच संबंधित शेतकऱ्याला नुकसानाच्या पाचपट भरपाई देण्यात यावी.
-मनीष जाधव,
शेतकरी नेते, वाकद महागाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com