
यवतमाळ : कोरोनाच्या संकटाने अवघे जगच हादरून गेले आहे. अनेकांच्या मल्टिनॅशनल कंपनीतील नोकऱ्या गेल्या. उद्योगधंदे बंद झाल्याने कित्येकांना आपल्या घरी परत यावे लागले. स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी होण्याची स्वप्न बघणाऱ्या तरुणांवर हातातील पुस्तक खाली ठेवण्याची वेळ आली. शेतकरी म्हणताच नाके मुरडणाऱ्यांनाही आता शेतीची आठवण येऊ लागली आहे.
मार्च महिन्यापासून मुक्कामी आलेल्या आणि अजूनही जाण्याचे नाव न घेणाऱ्या कोरोना विषाणूजन्य आजाराने मानवी जीवनाची पुरती वाट लावली आहे. काबाडकष्ट करून दोन वेळ कसेबसे पोट भरणाऱ्या कष्टकरी वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. नोकरी करून सुखवस्तू जीवन जगणाऱ्यांसमोर नवीनच संकट उभे केले आहे. हातातील काही हजारांची नोकरी गेल्याने आतापर्यंत हायप्रोफाइल लाइफस्टाइल जगणाऱ्यांच्या जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सुशिक्षीत तरुणांना आपले भविष्य अंधकारमय दिसत आहे. एकूणच काय तर, नोकरी बेभरवशाची झाली आहे. त्यामुळे नवीन काय करता येईल, याची चाचपणी केली जात आहे. शेती असणारे आणि नसणारेदेखील शेतीत पुढील करिअर घडवता येइल का, याची चाचपणी करताना दिसत आहेत. फार्मसी पदविका घेतलेला आशीष राऊत हा तरुण व्यवसायासोबत उत्तमप्रकारे शेती करीत आहे. अभिनव कांबळे या तरुणाची पुणे येथील कंपनीत निवड झाली होती. कोरोनामुळे त्यालाही आता घरीच रहावे लागत आहे. पवन जगतापने स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला विराम देत व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्याही डोक्यात शेतीचा विचार येत आहे.
कोणतीही गोष्ट मनापासून केल्यास यश मिळविता येते. आमच्या पिढीला शेती हा व्यवसाय तोट्याचा वाटत होता. त्यामागे कारणेही तसेच आहे. निसर्ग साथ देत नाही, मजूर मिळत नाही, मालाला भाव मिळत नाही. त्यामुळे सुशिक्षित तरुण शेतीबाबत उदासीनता बाळगत होते. मात्र, कोरोनामुळे शेतीपासून दुरावलेलेही आता कृषीकडे वळत आहेत.
आशीष राऊत, रा. वरुड, ता. दारव्हा
वडिल सेवानिवृत्त झाल्याने कुटुंबाची जबाबदारी आली. कोरोना येण्यापूर्वी पुणे येथील एका कंपनीत निवड झाली होती. तिथे रूजू होण्याच्या तयारीत असताना लॉकडाउनमुळे घराबाहेर पडू शकलो नाही. अजून घरी जास्त दिवस बसून राहणे शक्य नाही. त्यामुळे खासगी काम करणे सुरू केले आहे.
-अभिनव कांबळे, एमएसडब्ल्यू, यवतमाळ.
मागील काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहो. मात्र, सरकारी नोकरी लागली नाही. तरीही प्रयत्न सोडला नाही. आता तर कोरोनामुळे आगामी काही वर्ष भरती होण्याची शक्यता मावळली आहे. स्वत:चे वाहन आहे. त्यातून दोन पैसे मिळतात. लॉकडाउनच्या काळात तेही जागेवरच उभे होते.
-पवन जगताप, बी. कॉम, यवतमाळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.