
यवतमाळ : मृत्यू हे अंतिम सत्य आहे, असे म्हटले जाते. त्यामुळेच मृत्यूनंतरचा अंतिम प्रवास व्यवस्थित व्हावा, यासाठी सर्व काळजी घेतली जाते. मात्र, ज्या ठिकाणी अंतिम प्रवासासाठी जायचे आहे, ते ठिकाणच सध्या मरणाव्यवस्थेत आहे. जिल्ह्यातील तब्बल 464 गावांत अजूनही स्मशानभूमी नाही. परिणामी, उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. वणी तालुक्यातील एका गावात स्मशानभूमीच नसल्याने अंत्यविधी नदीपात्रात करण्यात आला. मात्र, नदीला पाणी आल्याने मृतदेह वाहून गेल्याची घटना नुकतीच घडली आहे. असे असतानाही स्मशानभूमीच्या निधीवरून जिल्ह्यात राजकारण सुरू आहे.
तब्बल साडेचारशेहून अधिक गावांत स्मशानभूमी नाही
जिल्ह्यात बाराशेहून अधिक ग्रामपंचायती आहेत. गावांची संख्या दोन हजारांच्यावर आहेत. असे असताना अद्यापही जिल्ह्यातील तब्बल साडेचारशेहून अधिक गावांत स्मशानभूमी नाही. परिणामी, गावात कुणाचेही निधन झाल्यास उघड्यावरच अंत्यविधी करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा प्रशासनासह लोकप्रतिनिधींना नागरिकांकडून निवेदन देण्यात येते. मात्र, कुणीही याची दखल घेतली नाही. जिल्हा परिषदेने जनसुविधा व रोजगार हमी योजना रुंपातरीत करून जवळपास साडेचारशे गावांतील स्मशानभूमी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानुसार ग्रामपंचायतस्तरावर निधीसुद्धा वितरित करण्यात आला. असे असताना प्रशासनाने अचानक कामे रद्द करून यादी बदलविण्यात आली. त्यामुळे या निधीवरून व कामांच्या मंजुरीवरून राजकारण केले जात आहे. स्मशानभूमीसाठी शेड नसल्याने जिल्ह्यात आजही अनेक गावांत पावसाळ्यात अत्यंविधी करण्याची अडचण नागरिकांसमोर येते. मात्र, गावपुढारी व लोकप्रतिनिधींना हे दिसत नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. परिणामी, अनेक गावे आजही स्मशानभूमीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्या 161 कामे प्रस्तावित करण्यात आले आहेत. काही कामे सध्या सुरू आहेत. त्यात प्रामुख्याने यवतमाळ तालुक्यात 11, बाभूळगाव चार, कळंब नऊ, राळेगाव सहा, घाटंजी नऊ, पांढरकवडा 14, आर्णी 12, मारेगाव सहा, झरी जामणी चार, वणी नऊ, नेर नऊ, दारव्हा 18, दिग्रस आठ, पुसद 22, महागाव 14, उमरखेड 17 असे मिळून 161 गावांचा समावेश आहे. असे असले तरी साडेचारशे गावांत स्मशानभूमीच नसल्याने उघड्यावरच अंत्यंसंस्कार करावे लागत आहे. याबाबत लोकप्रतिनिधी व प्रशासनाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. केवळ आश्वासन देण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून केले जात असल्याची ओरड सर्वसामान्यांकडून होत आहे.
एवढ्या गावांना स्मशानभूमीची प्रतीक्षा
जिल्ह्यातील यवतमाळ तालुक्यात 46, बाभूळगाव 15, कळंब 20, राळेगाव 20, घाटंजी 20, पांढरकवडा 25, आर्णी 40, मारेगाव 25, झरी जामणी 18, वणी 26, नेर 20, दारव्हा 55, दिग्रस 15, पुसद 47, महागाव 25, उमरखेड 48 असे 464 गावांत स्मशानभूमीची प्रतीक्षा आहे.
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
जिल्ह्याभरातील पावणेपाचशे गावांत स्मशानभूमी नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची मृत्यूनंतरही वाट बिकट होत आहे. पावसाळ्यात अत्यंत भयावह स्थिती राहते, याची परिपूर्ण कल्पना लोकप्रतिनिधींना आहे. परंतु, आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या लोकप्रतिनिधींचे चक्क स्मशानभूमी बनविण्याकडेही दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते. याबाबत लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.