अमरावतीतील बाजारपेठा शनिवार, रविवारी राहणार बंद!वाचा काय आहे कारण...

lockdown
lockdown

अमरावती : टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतोच आहे. नागरिक किती दिवस आपले व्यवहार बंद ठेवणार, त्यामुळे रस्त्यांवरची गर्दीही वाढते आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर दर आठवड्यात शनिवार, रविवार या दोन दिवशी बाजारपेठा बंद ठेवण्याचा आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी (ता. सात) शहर आणि संपूर्ण जिल्ह्यासाठी जारी केला.

आदेशानुसार दर आठवड्यातील शुक्रवारी सायंकाळी सातपासून ते सोमवार सकाळी सातपर्यंत (60 तास) शहरी व ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठा, सर्व प्रकारचे बाजार, दुकाने, मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्‍स येथील पी-1 व पी-2 धर्तीवर या तत्त्वावर मान्यता दिलेली रस्त्याच्या दोन्ही बाजूची दुकाने, जीवनावश्‍यक वस्तूंमध्ये समावेश असलेली किराणा, धान्य दुकाने, बाजार समितीच्या अधिसूचित भाजीपाला व फळयार्ड, सर्व पर्यटनस्थळे, सर्व राष्ट्रीयकृत सरकारी बॅंका, खासगी बॅंका, सहकारी संस्था, पतपेढ्या, आर्थिक बाबींशी संबंधित सर्व वित्तीय संस्था बंद राहतील. अनावश्‍यक कारणासाठी चारचाकी किंवा दुचाकीद्वारे प्रवास करणाऱ्या किंवा पर्यटनस्थळी गर्दी करणाऱ्यांविरुद्ध दंडात्मक व फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्याचे निर्देश आहेत.

सुरू राहणाऱ्या सेवा
अत्यावश्‍यक सेवांतर्गत सर्व दूधविक्री केंद्रे, डेअरी (सकाळी सहा ते सकाळी दहा), सर्व आरोग्य सेवा, औषधी दुकाने, एमआयडीसीतील उद्योग, वीजसेवा, गॅससेवा, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी परवानगी दिलेले विवाह समारंभ होतील. मात्र, यापुढील कालावधीत शनिवार, रविवार या दिवशी लग्नसमारंभाला परवानगी दिली जाणार नाही. प्रिंट मीडिया, इलेक्‍ट्रॉनिक्‍स मीडिया, डीटीएच, केबल सेवा, वृत्तपत्रे सेवा (विक्री व वितरण), पत्रकारांना सेवार्थ संचार, पेट्रोलपंप आणि शासकीय हमीभावाप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समित्यांत होणारी खरेदी सुरू राहील.

नागरिकांना सहकार्याचे आवाहन
65 वर्षे किंवा त्यावरील ज्येष्ठ, वृद्ध, आजारी व्यक्ती, महिला, गर्भवती महिला, 10 वर्षांखालील मुले यांनी आवश्‍यक कारणांशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई आहे. कंटेनमेंट झोनमधील सर्व व्यवहार बंद राहील तसेच झोनमधील नागरिकांच्या हालचालीस प्रतिबंध घालण्यात आलेला आहे. आरोग्य आदी अत्यावश्‍यक कारणासाठी बाहेर पडणाऱ्यांना मास्क वापरावा लागेल व दोन व्यक्तीत किमान सहा फुटांचे अंतर ठेवावे लागेल.

प्रशासनाला निर्देश
महापालिकेच्या क्षेत्रात पालिका आयुक्त, तालुके व इतर शहरांत मुख्याधिकारी व तहसीलदार यांनी संचारबंदीची आवश्‍यक अंमलबजावणी करावी. पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात कडक नियंत्रण ठेवावे. ध्वनिक्षेपक तसेच विविध माध्यमांतून व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com