हजारो कोटी खर्चूनही महाराष्ट्र तहानलेलाच

File photo
File photo

अमरावती : राज्यात दुष्काळमुक्तीची घोषणा करीत फडणवीस सरकारने हजारो कोटी रुपये खर्चून जलयुक्त शिवारसारख्या योजना राबविल्या, मात्र जलसंधारणाच्या या योजना अपयशी ठरल्या असून आजही महाराष्ट्रात चार हजारांहून अधिक टॅंकर सुरू आहेत. त्यामुळे या योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे, असा आरोप
कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज (ता.26) येथे केला.
कॉंग्रेसच्यावतीने येथील तेलाई मंगल कार्यालयात सोमवारी (ता.26) महापर्दाफाश सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर कॉंग्रेसचे प्रदेश प्रचार समिती प्रमुख नाना पटोले, आशीष दुआ, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नितीन राऊत, मोहन जोशी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बबलू देशमुख, आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, आमदार यशोमती ठाकूर, आमदार वजाहत मिर्जा, माजी आमदार आशीष देशमुख, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, कॉंग्रेस शहराध्यक्ष किशोर बोरकर, चारूलता टोकस, विलास इंगोले, छाया दंडाळे, जि.प. सभापती जयंत देशमुख, नरेशचंद्र ठाकरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. थोरात पुढे म्हणाले, शेतकऱ्यांची कर्जमाफी, दुष्काळ निर्मूलन, रोजगार यासर्व घोषणा फसव्या ठरल्या असून यापैकी एकही घोषणा प्रत्यक्षात उतरलेली नाही. त्यामुळे सर्वसामान्य जनता व शेतकरी आगामी निवडणुकीत भाजप सरकारला धडा शिकवेल, असेही ते म्हणाले. एकही न केलेले काम केल्याचे सांगण्यासाठी मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रेचा आश्रय घ्यावा लागत आहे. विशेष म्हणजे राज्यात पूरस्थिती असतानाही मुख्यमंत्र्यांना महाजनादेश यात्रेपासून उसंत मिळत नसल्याबद्दल थोरात यांनी त्यांच्यावर टीका केली. माजी खासदार नाना पटोले यांनी भाजप सरकारच्या काळात विकास झाला नसून केवळ मंत्र्यांनी व भाजप- सेना पदाधिकाऱ्यांनी स्वतःचा विकास केल्याचा आरोप केला. माजी मंत्री नितीन राऊत, माणिकराव ठाकरे, आमदार प्रा. वीरेंद्र जगताप, आमदार यशोमती ठाकूर आदींनीही यावेळी मार्गदर्शन केले.


सरकारला घरचा रस्ता दाखवा
सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या भाजप -सेना युतीच्या सरकारची घटका आता भरली असून या भ्रष्टाचारी सरकारला घालविण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी जोमाने प्रयत्न केले पाहिजे. फडणवीस सरकारकडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराची पोलखोल करण्याची वेळ आता आली असून महापर्दाफाश सभेच्या माध्यमातून कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप सरकार घालवून टाकण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रास्ताविकात केले.

रावसाहेब शेखावतांची अनुपस्थिती
कॉंग्रेसच्यावतीने आयोजित महापर्दाफाश सभेला माजी आमदार रावसाहेब शेखावत उपस्थित नव्हते. त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात सुद्धा या विषयावर स्पष्ट मत व्यक्त करू शकले नाही.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com