जोशींच्या फतव्याने महामंडळ "खामोश'!

File photo
File photo

नागपूर : "मला विचारल्याशिवाय कुठलीही माहिती माध्यमांना देऊ नये' असा फतवा काढून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी कार्यकारिणी सदस्य आणि संमेलन आयोजकांना "खामोश' करून ठेवले आहे. या फतव्यामुळे कार्यकारिणीतील इतर सदस्यांची भूमिका सूत्रसंचालन व आभार व्यक्त करण्यापुरतीच मर्यादित होऊन बसली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी स्वतः एवढ्या सविस्तरपणे एखादी बाब मांडतात की, दुसऱ्या कुणाला त्यावर अधिक बोलण्याची गरज पडू नये. मूळ मुद्यावर येण्यापूर्वीचे त्यांचे प्रास्ताविकही कुणालाच काही बोलण्याची गरज पडणार नाही, एवढे सविस्तर असते. मात्र, तरीही अध्यक्ष वगळता महामंडळातील 18 पदाधिकारी-सदस्यांना एखाद्या घटनेचे, उपक्रमाचे, आयोजनाचे श्रेय घेण्याची किंवा त्याबद्दल अधिक माहिती देण्याची इच्छा झालीच तर त्यावर अध्यक्षांनी नियमांची पट्टी लावलेली आहे. बडोद्यात झालेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वी "आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संमेलनाला येण्याचे निमंत्रण पाठविले आहे' एवढी माहिती माध्यमांना दिली होती. त्यावर अध्यक्षांनी थेट प्रसिद्धिपत्रक काढून बोलण्याचा अधिकार फक्त महामंडळाच्या अध्यक्षांकडे कसा आहे, हे दीड पानांच्या मजकुरातून पटवून दिले होते. हीच मालिका यवतमाळातील यजमानांच्या बाबतीत कायम असून संमेलनाच्या आयोजनासंदर्भात माध्यमांशी संवाद साधताना त्यांना या अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखादा मुद्दा पटवून देण्यात आपला हात कुणीही पकडू शकत नाही, असे अध्यक्षांना वाटत असावे. मात्र, मुळात त्यांच्या विस्तृत विवेचनापुढे "नतमस्तक' होऊन "आता बोलायची गरज नाही' अशीच भूमिका घेण्याची वेळ इतर पदाधिकाऱ्यांवर येते. त्यामुळे सुरुवातीला या परिस्थितीचा धाक आणि गळचेपी या विशेषणांमध्ये होणारे वर्णन आता "आणखी किती दिवस?' एवढ्यावर येऊन पोहोचले आहे. घटना आणि नियमांवर बोट ठेवूनच महामंडळ अध्यक्ष हा कारभार चालवत असले तरीही काही वर्षांपूर्वी माध्यमांमध्ये "महामंडळ' गाजविणारेही ते स्वतःच होते, हे विसरून चालणार नाही.
नियम हे कोणताही धाक घालण्यासाठी नसतात. कार्य निर्विघ्नपणे व्हावे, यासाठी असतात. महामंडळ फक्त घटना व नियम संमेलन आयोजित करणाऱ्यांना ठाऊक करून देत असते. त्यांचे पालन केले जाईल अशाच सूचना करीत असतो.
- डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी
अध्यक्ष, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com