सतर्क रहा! सप्टेंबर महिन्यात वाढू शकतो कोरोनाचा कहर.. या मंत्र्यांनी केले जनतेला आवाहन.. वाचा सविस्तर  

Minister Wadettiwar visited flooded areas in Gadchiroli
Minister Wadettiwar visited flooded areas in Gadchiroli

गडचिरोली : कोरोनाबाबत सप्टेंबर महिना गडचिरोलीकरांसाठी महत्त्वाचा राहणार आहे. त्यावेळी संसर्ग वाढण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनासह लोकांनी आवश्‍यक काळजी घ्यावी व बचावासाठी सतर्क रहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी केले.

सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना संसर्ग व पूरपरिस्थितीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यातील कोरोना स्थितीबाबत माहिती दिली व पूरस्थितीबाबत सादरीकरण केले. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, आमदार धर्मरावबाबा आत्राम, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषदेचे सदस्य ऍङ. राम मेश्राम व संबंधित विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. 

आवश्‍यक व्यवस्थापन करा

प्रत्येक शहरात ठराविक काळात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. मुंबई, पुणे पाठोपाठ नागपूर या ठिकाणीही मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एका ठराविक वेळेत संख्या वाढलेली दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातही रुग्णांच्या संख्येच्या वाढीनुसार सप्टेंबर महिना महत्त्वाचा राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी सादरीकरणात दिली. यावेळी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सप्टेंबर महिन्यात रुग्ण संख्या वाढत असेल तर त्याबाबत आवश्‍यक व्यवस्थापन करा, अशा सूचना दिल्या. 

गर्दी होत असेल तर कारवाई करा

जिल्ह्यातील अनावश्‍यक गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करा. सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्धारित संख्येच्या पलीकडे गर्दी होत असेल तर कारवाई करा, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. त्याचबरोबर रुग्णांच्या उपचारादरम्यान उपलब्ध मनुष्यबळ व रुग्णसेवा यांचे योग्य व्यवस्थापन करा. यातून प्रत्येक रुग्णाला आवश्‍यक उपचार देता येतील, याकडे लक्ष द्या, असे निर्देश त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे व जिल्हा आरोग्य अधिकारी शशिकांत शंभरकर यांना दिले. बैठकीत जिल्ह्यातील भामरागड, सिरोंचा येथील आलेल्या पुराबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी आवश्‍यक मदत नागरिकांना वेळेत द्या, अशा सूचना केल्या. 

कायमस्वरूपी उपाययोजना राबवणे आवश्‍यक

दरवेळी अहेरी, सिरोंचा व भामरागडमध्ये पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत होते. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी कोणकोणती कामे आवश्‍यक आहेत ती ठरवून त्यांचे प्रस्ताव तातडीने सादर करा. आपत्तीपासून लोकांना दूर ठेवून चांगल्या प्रकारे जीवन जगता यावे, यासाठी मी निधी कमी पडू देणार नाही, असेही त्यांनी उपस्थित विभागप्रमुखांना सांगितले.

पूरपरिस्थितीवर नियंत्रणासाठी साहित्य

जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी जिल्ह्यात 6 रबर बोट, 14 सुरक्षा टेंट, 210 लाइफ-बॉय, 210 लाइफ जॅकेटसह इतर आवश्‍यक साहित्य मिळाल्याचे सांगितले. या साहित्याचे वाटप पूरपरिस्थिती उद्‌भवणाऱ्या तालुक्‍यांना पोहच केल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्व साहित्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने मंजूर केलेल्या निधीतून घेण्यात आले आहे. यावेळी मंत्री वडेट्टीवार यांनी या साहित्याद्वारे नागरिकांना चांगली सेवा देता येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. जिल्ह्याच्या दुर्गम भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यासाठी व नव्याने मंजूर असलेल्या सब स्टेशनच्या निधी व मंजुरीबाबत राज्यस्तरीय बैठक लावण्याचे निर्देश मंत्री वडेट्टीवार यांनी दिले.


संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com