हिवरखेड : काही वर्षापूर्वी भाजी करते वेळी कांडण-कुटण करण्यासाठी घरामध्ये लागणारा पाटा वरवंटा हळूहळू हद्दपार झाला आहे. पाटा-वरवंटा, जाते, उखळ-मुसळ या गृहपयोगी वस्तू काळाच्या ओघात लूप्त होत चालल्या असून, अलीकडे त्याची जागा वीजेवर चालणाऱ्या साहित्याने घेतली आहे. त्यामुळे या वस्तू आता काळाच्या पडद्याआड गेल्या आहेत.
ग्रामीण भागांमध्ये पूर्वी दळण दळण्यासाठी जाते असायचे. घरातील महिला भल्या पहाटे उठून जात्यावर ओवी गात दळण दळायच्या. रोज सकाळी दळण दळत डाल्यानंतरच घरामध्ये भाकरीसाठी पीठ उपलब्ध होत असे. याशिवाय भाजीसाठी लागणारे तिखट मसाला हे कांडण केल्यानंतरच उपलब्ध होत असे. यासाठी प्रत्येक घरांमध्ये दगडी पाटा वरवंटा उखळ असायचे. लाकडी वस्तूमध्ये कांडण करण्यासाठी मुसळ असायचे. त्याचबरोबर घरांमध्ये दूध दही मुबलक रहायचे. दहीचे घुसळून करून ताक, लोणी काढण्यासाठी रई असायची. परंतु, आता या वस्तू दुर्मिळ होत चालले आहेत. पूर्वी घराचे वैभव म्हणून सांभाळल्या जाणाऱ्या या वस्तू आता आधुनिक यंत्रयुगात घरांमध्ये अडचणीचे ठरत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातही शहरी भागाचे अनुकरण होत असल्यामुळे या वस्तू ग्रामीण भागातील घरातूनही हद्दपार केल्या जात आहेत. त्यामुळे कधीकाळी संसाराचे वैभव मानल्या जाणाऱ्या या वस्तू नाहीशा होत असल्याची खंत वयोवृद्धांना आहे.
जेवणाची चव काही औरच
स्वयंपाक करताना पाटा-वरवंटा उखळाच्या माध्यमातून तिखट मसाल्याचे कांडन-कुटन करून भाजी केली जायची. त्या भाजीची चव काही औरच असायाची. पण आता बदलत्या काळानुसार यंत्रसामग्रीच्या माध्यमातून कांडणा-कुटन केले जात असून, भाजीची चवही हद्दपार झाली आहे. मात्र, यंत्रसामग्रीच्या माध्यमातून दळण कुटण, कांडण करण्यासाठी महिलांना अधिक वेळ लागत नसल्याने घरातील कामेही लवकर उरकत आहेत. पण परंपरिकतेचा ऱ्हास होत आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.