यवतमाळ : पूर्ववैमनस्यातून धारदार शस्त्राने तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना मंगळवारी (ता. 30) रात्री येथील बांगरनगरातील साई किराणा दुकानाजवळ घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सागर नारायण भुते (वय 27, रा. बुटले ले-आउट, पिंपळगाव रोड, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. चारही मारेकरी 19 ते 24 वर्षे या वयोगटातील आहेत. सागर व मारेकऱ्यांत यापूर्वी वाद झाला होता. त्याचा राग मारेकऱ्यांच्या मनात होता. आपसी समझोता करण्यासाठी तरुणाला बांगरनगरात बोलावले. चर्चा सुरू असतानाच सायंकाळी सात ते 7.40 मिनिटाच्या कालावधीत चौघांनी दगड व धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना लक्षात येताच सागरला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, अवघ्या काही वेळात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
याप्रकरणी मनोरमा नारायण भुते (वय 45, रा. बुटले ले-आउट, यवतमाळ) यांनी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून संशयित विवेक कांबळे (वय 19, रा. वाघापूर), पवन पाईकराव (वय 24, रा. वाघापूर), आयुष पंचभाई (वय 20, रा. बांगरनगर, योगेश वाघ (वय 21, रा. बांगरनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. सागरचा गेम करताच मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. केवळ एक संशयित पोलिसांच्या हाती लागला. फरार असलेल्यांचा पोलिस कसून शोध घेत आहेत. पुढील तपास ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
या खून प्रकरणातील चारही आरोपी 19 ते 24 या वयोगटातील आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या गुन्ह्यांमध्ये आरोपी तरुणच आहेत. त्यामुळे सध्या तरुणाई कुठे चालली आहे हा प्रश्न निर्माण होतो. कोरोनामुळे आलेले लॉकडाऊन, शाळा, महाविद्यालये बंद असल्याने रिकामटेकड्या तरुणांच्या हाताला काम नसल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटना वर्चस्वाच्या वादातून घडल्या असून, त्यातील आरोपही तरुण वर्गच असल्याचे पालकांची चिंता वाढली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.