सावधान! निपाह व्हायरस पसरतोय 

सावधान! निपाह व्हायरस पसरतोय 

नागपूर -  केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे एकाच कुटुंबातील तिघांचा तर एकूण 10 जणांचा मृत्यू झाला. वटवाघळाच्या संपर्कामुळे हा संसर्ग झाला. पशुजन्य आजार संधीची वाट पाहतात. त्यामुळे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ झुनोसिस (एनआयझेड) नागपूरची स्थापना करणे गरजेचे असल्याचे मत नॅशनल असोसिएशन फॉर वेल्फेअर ऑफ अनिमल्स ऍण्ड रिसर्चचे (नावार) सचिव डॉ. अजय पोहरकर यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

प्राण्यांपासून मनुष्याला व मनुष्यापासून प्राण्यांना होणाऱ्या आजारांना पशुजन्य आजार (झुनोटिक डिसीज) म्हणतात. या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पशुवैद्यक व वैद्यक यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. 60 टक्के आजार झुनोटिक आहेत. त्यापैकी प्राण्यांपासून मनुष्याला होणारे आजार 75 टक्के आहेत. गेल्या तीन दशकांपासून दरवर्षी एक नवीन आजार डोकं वर काढतो. तोही पशुजन्य आजार असतो. 

पशुजन्य आजारांवर हवे नियंत्रण 
नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयातील पशुजनस्वास्थ्य विभागात सुमारे 60 हजार जिवाणूंचे अत्यंत कमी वेळात रोगनिदान करणारी यंत्रणा आहे. एनआयझेडची स्थापना झाल्यास पशुजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे शक्‍य होईल. निपाह व्हायरससारखे इबोला, डेंगी, जापानी ज्वर, रिफ्ट व्हॅली फिवर, हंटा व्हायरस, कोरोना व्हायरससारखे विषाणू नियंत्रणात ठेवता येतील, असेही डॉ. अजय पोहरकर म्हणाले. 

निपाह व्हायरसपासून बचावासाठी वटवाघळांपासून दूर राहावे. झाडावर वटवाघळांनी खाल्लेले फळ खाऊ नये. वटवाघळांची वस्ती असलेल्या झाडाखाली फळ, भाजीपाला व खाद्यपदार्थांची विक्री करू नये. फळे व भाजीपाला स्वच्छ धुवूनच वापरावा. हात धुवूनच खाद्यपदार्थ खावे. सर्दी, पडसे, ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, चक्कर येणे, गरगरणे, मेंदूज्वरसदृश रुग्णास तपासताना आरोग्यसेवकांनी ग्लोव्हज, मास्क आदी वापरून स्वतःचा बचाव करावा. 
- डॉ. अजय पोहरकर, सदस्य, महाराष्ट्र राज्य पशुवैद्यक परिषद, नागपूर 
(पासपोर्ट - पोहरकर) 

असा होतो निपाह 
वटवाघळाची विष्टा, लाड किंवा लघवी फळाच्या संपर्कात येते. असे फळ खाल्यास मानवाला किंवा डुक्कर, घोडा यांना निपाह होतो. केरळमध्ये डुकराच्या माध्यमातून मानवाला हा आजार झाला आहे. यावर कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही. रोगसर्वेक्षण करून सुरक्षेच्या उपाययोजना करणे हाच उपाय आहे. 

जनावरांचे आरोग्य निरोगी हवे 
जागतिक आरोग्य संघटनेने मानव, पशू व पर्यावरण यांची साखळी प्रस्थापित करून एक जग, एक आरोग्य ही संकल्पना प्रस्थापित केली. मानवाला प्राण्यांपासून दूध, अंडी व मांस हे खाद्यपदार्थ मिळतात. निरोगी खाद्य हवे असल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राखणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com