तब्बल 55 दिवसांनंतर 53 जण स्वगृहाकडे रवाना, कुठे गेले होते, का अडकले, वाचाच...

रामटेक  :  लॉकडाउनमध्ये अडकल्यानंतर तब्बल 55 दिवसांनी स्वगावाकडे निघालेले शिक्षक.
रामटेक : लॉकडाउनमध्ये अडकल्यानंतर तब्बल 55 दिवसांनी स्वगावाकडे निघालेले शिक्षक.

रामटेक (जि.नागपूर)  :  25 दिवसांच्या तीर्थाटनाला निघालेल्या 53 यात्रेकरूंना लॉकडाउनमुळे रामटेक येथेच 55 दिवस अडकून पडावे लागले. अखेर आमदार आशीष जयस्वाल यांच्या प्रयत्नांमुळे विनंती मान्य झाली. त्यानंतर तब्बल 55 दिवसांनी हे यात्रेकरू दोन विशेष गाड्यांनी बुधवारी जयसिंगपूरकडे (जि.कोल्हापूर) रवाना झाले. विशेष म्हणजे हे सर्व जैन यात्रेकरू सेवानिवृत्त शिक्षक-शिक्षिका आहेत.

रामटेकच्या शांतीनाथ मंदिरात होता मुक्‍काम
जयसिंगपूर (जि.कोल्हापूर) येथील सेवानिवृत्त 50 जैन यात्रेकरू शिक्षक-शिक्षिका, वाहनचालक, क्‍लीनर व आचाऱ्यांसह एकूण 53 जण 7 मार्चला तीर्थाटनाला निघाले. रामटेक येथील शांतीनाथ जैन मंदिर येथे त्यांचे 12 मार्चला आगमन झाले. हा त्यांचा चौथा मुक्काम होता. येथून दुसऱ्या दिवशी ते समोर निघाले. कोणार्क, कोलकाता, सिलिगुडी, दार्जिलिंगपर्यंत पोहोचले. त्यांना पुढेही जायचे होते. मात्र, त्यादरम्यानच 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे तिथूनच ते परतीच्या प्रवासाला निघाले. चंपापूर, भागलपूर, जबलपूर असे मार्गक्रमण करीत ते12 मार्चला सकाळी रामटेकच्या शांतीनाथ मंदिर येथे पोहोचले आणि येथेच अडकून पडले. ते 60 ते 70 वर्षांचे सर्व ज्येष्ठ नागरिक होते. संचारबंदी लागू असल्याने त्यांना समोर जाणे शक्‍यच नव्हते. रामटेक येथील उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना त्यांची माहिती मिळाली. त्यांनी या सर्व ज्येष्ठ नागरिकांची भेट घेतली. शासनाकडून त्यांच्यासाठी भोजन साहित्य पुरवण्यात आले. मात्र, घराची आणि मुलाबाळांची आठवण त्यांना बेचैन करीत होती. शासनाकडून आमची उत्तम व्यवस्था राखण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मानसिक आधार देण्याचे काम
जयसिंगपूरचे आमदार आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यद्रावकर, मंत्री हसन मुश्रिफ, रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. आमदार जयस्वाल यांनी मुख्य सचिव, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून विशेष परवानगीसाठी प्रयत्न सुरू केले. रामटेक न. प. विरोधी पक्षनेता सुमित कोठारी, कॉंग्रेसचे जिल्हा अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष असलम शेख, अक्रम शेख, मंडळ अधिकारी पी. जी. जांभुळे यांनी या सर्वांची दरदिवशी भेट घेऊन त्यांना मानसिक आधार देण्याचे कार्य केले. शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर समितीचे अध्यक्षासह विश्वस्त, व्यवस्थापक यांनीही त्यांना सुविधा उपलब्ध करून दिल्या. आज या सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळून या सर्व जणांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी मिळाली.

सर्व नियम पाळून...
एकाच वाहनातून आलेल्या या सर्वांना आता सुरक्षित अंतराने प्रवास करायचा असल्याने आणखी एक बस उपलब्ध करून देण्यात आली. एका आसनावर एकच जण बसून त्यांना आपले गाव, घर गाठायचे आहे. विशेष परवानगीचे पत्र आमदार जयस्वाल यांनी या ज्येष्ठ नागरिकांना दिले. त्यावेळी सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. आता त्यांना घराची ओढ लागली होती. सर्वांचे आभार मानून आणि जेवण घेऊन दोन विशेष बसने सर्वांनी "जय जिनेंद्र' करीत रात्री आठ वाजता परतीचा प्रवास सुरू केला.  
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com