उग्र राष्ट्रवाद भारतासाठी घातकच

संदीप वासलेकर : जगावर अणुयुद्धाचे सावट
world nuclear war Sandeep Vaslekar statement
world nuclear war Sandeep Vaslekar statement

नागपूर : अमेरिका, रशिया, चीनमध्ये वाढत चाललेल्या उग्र राष्ट्रवादामुळे जगावर युद्धाचे सावट पसरले आहे. भारताचीही अलीकडची वाटचाल याच दिशेने सुरू असून ती संपूर्ण मानव जातीसाठी घातक असल्याचे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक, विश्लेषक संदीप वासलेकर यांनी सांगितले.

नागपूर प्रेस क्लबतर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. वासलेकर म्हणाले, रशिया आणि युक्रेनच्या युद्धामुळे संपूर्ण जग अणुयुद्धाच्या सावटात आहे. यात खरोखरच अणू आणि जैविक अस्त्राचा वापर झाल्यास संपूर्ण मानव जातीचे अस्तित्व संपुष्टात येऊ शकते. रशिया, अमेरिका आणि चीन या बलाढ्य देशांनी उग्र राष्ट्रवादाला खतपाणी घातले असून सर्वांकडे घातक अण्वस्त्र आहेत.

प्रत्येकाला आपले वर्चस्व निर्माण करायचे आहे. युक्रेन हा देश यात पोळला जात आहे. खरे युद्ध रशिया आणि अमेरिकेत सुरू आहे. याच उग्रवादाचा परिणाम अनेक देशांवर झाला असून भारताचाही त्यात समावेश आहे.

देशांतर्गत उग्रवाद वाढत चालला असला तरी जागतिक पातळीवर भारताची भूमिका तटस्थ आणि शांततेची आहे. ही सुदैवाची बाब असल्याचे वासलेकर यांनी सांगितले. प्रारंभी ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित यांनी वासलेकर यांचा परिचय करून दिला तर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र यांनी त्यांचे स्वागत केले.

‘युनो‘महात्मा गांधी यांची संकल्पना

भारताच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढा सुरू असताना युनो सर्वप्रथम संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली होती. हरीजन आणि यंग इंडिया या पत्रिकांमधून त्यांनी लिखाणही केले होते. जागतिक शांततेसाठी महात्मा गांधी यांनी सर्व देशांना समान अधिकार आणि कमीत कमी शस्त्र साठा ठेवला पाहिजे, अशी भूमिका मांडली होती.

हीच संकल्पना पाश्चिमात्य देशांनी उचलली. मात्र त्यातील ‘व्हेटो पॉवर’ हे गांधी यांच्या संकल्पनेत नव्हते. बलाढ्य देशांनी यात बदल केला. हा बदलही घातक तसेच एकाधिकारशाही असल्याचे वासलेकर यांनी सांगितले.

भारत-पाक अणुयुद्धाची शक्यता नाही

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद विकोपाला गेले आहेत. ताणतणाव निर्माण होत असले तरी अणुयुद्धाची शक्यता फारच कमी आहे. भारत समंजस आहे तर पाकिस्तानालाही त्याचे चटके बसतील याची जाणीव आहे.

मात्र, अपघाताने किंवा दहशतवाद्यांच्या हाती ही शस्त्रे लागल्यास काहीही होऊ शकते. पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशात आर्थिक आणि राजकीय अस्थिरतेचा फटका भारताला बसू शकतो याकडेही वासलेकर यांनी लक्ष वेधले. विशेष म्हणजे संदीप वासलेकर यांचा भारत आणि पाकिस्तानमधील वाटाघाटींसाठी स्थापन केलेल्या प्रत्येकी १० सदस्यांच्या गोपनीय चमूमध्ये समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com