Biometric Attendance : अकरावीच्या विद्यार्थ्यांची ‘बायोमॅट्रिक’ हजेरी, शिक्षण विभागाचा आदेश; ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य

नागपूर शहर व परिसरातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये खासगी शिकवणी वर्गाशी हातमिळवणी होत असल्याच्या तोंडी व लेखी तक्रारी सातत्याने शिक्षण विभागाकडे येत असतात.
Biometric attendance of 11th students
Biometric attendance of 11th studentsSakal
Updated on

नागपूर : नागपूर शहर व परिसरातील बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये खासगी शिकवणी वर्गाशी हातमिळवणी होत असल्याच्या तोंडी व लेखी तक्रारी सातत्याने शिक्षण विभागाकडे येत असतात. त्यामुळे आता त्यावर नियंत्रणासाठी शिक्षण विभागाकडून कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीनेच घेण्याच्या सक्त सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

शहरातील बहुतांश ज्युनिअर कॉलेज शिकवणी वर्गांशी टायअप केल्यामुळे कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती खूपच कमी आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. महाविद्यालयातील वर्गखोल्या रिकाम्या दिसतात. त्यामुळेच शिक्षण विभागाने बायोमेट्रिक पद्धतीने विद्यार्थिनींची हजेरी आणि संपूर्ण सत्रात विद्यार्थ्यांची ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याबाबत परिपत्रक जारी केले आहे.

विद्यार्थी गैरहजर असल्यास त्याचे कारण स्पष्ट करावे लागेल. तसेच कारण देखील न्याय्य असावे. एखादा विद्यार्थी वारंवार गैरहजर राहिल्यास त्याला बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसण्यापासून वंचित केले जाईल. कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये विहित वेळापत्रकानुसार नियमित वर्ग सुरू ठेवणे बंधनकारक आहे.

अधिकाऱ्यांकडून महाविद्यालयांची तपासणी

शाळा आणि महाविद्यालयांमधील उपस्थिती तपासण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी (जिल्हा परिषद) यांनी दर महिन्याला किमान २ कनिष्ठ महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक शाळांची तपासणी करणे आवश्यक आहे आणि गटशिक्षणाधिकारी यांनी किमान ३ कनिष्ठ महाविद्यालयांची तपासणी करणे आवश्यक आहे. यामध्ये वेळापत्रकानुसार वर्ग सुरू होतो की नाही याची खात्री करावी लागेल.

नंतर मान्यता काढून घेतली जाईल

विद्यार्थ्यांच्या उपस्थितीशिवाय शाळा किंवा महाविद्यालय सुरू असल्यास महाराष्ट्र खासगी शाळा नियम १९८१ आणि माध्यमिक शाळा तरतुदीनुसार शाळेची मान्यता काढून घेण्याची कारवाई करण्यात येईल, असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

अधिकाऱ्यांचे आर्थिक हित साधणार?

गेल्या अनेक वर्षांपासून टाय-अपबाबत विभागीय शिक्षण कार्यालयाकडे तक्रारी येत आहेत. मात्र, त्याबाबत कुठलीही कारवाई होताना दिसून आलेली नाही. याऊलट त्यांना कसा फायदा होईल याचीच अधिक काळजी कार्यालयातून झालेली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत उपसंचालक स्तरावरील सर्वच अधिकार काढून घेण्यात आले असल्याने आता बायोमॅट्रीक हजेरीचा ससेमिरा लावत आर्थिक तर साधण्यात येणार नाही ना अशी शंका शैक्षणिक वर्तुळात सुरू झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com