
राज्य सरकारविरोधात भाजपचे कंदील आंदोलन; अघोषित भारनियमनाचा आरोप
नागपूर : वीजटंंचाईला राज्य सरकारच जबाबदार असून अघोषित भारनियमाने हजारो कुटुंबीयांच्या उपजिविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच सुरक्षा अनामत रकमेत दुप्पट वाढ करून महाविकास आघाडी सरकारने नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लादल्याचा आरोप करीत शहर व जिल्हा भाजपने आज सायंकाळी कंदील व मेणबत्ती पेटवून आंदोलन केले. भाजपने आजपासून राज्यव्यापी कंदील आंदोलनाची घोषणा केली होती. शहरातील संविधान चौकात अंधार पडताच भाजपने कंदील लावून आंदोलन केले. माजी उर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे, शहर भाजपाध्यक्ष प्रवीण दटके, जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजप आमदारांच्या नेतृत्त्वात कंदील आंदोलन करण्यात आले.
देखभाल दुरुस्तीच्या फसव्या कारणाखाली लादलेले भारनियमन संपूर्ण मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील अशी घोषणा भाजपच्या नेत्यांनी दिल्या. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर असताना भारनियमनमुक्त असलेल्या महाराष्ट्रावर आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादली. आर्थिक बेशिस्तीला आळा घालण्यासाठी एक अभ्यास गट नेमण्याची सूचना राज्य वीज नियामक आयोगाने सरकारला चार महिन्यांपूर्वी केली होती. अद्याप अशा अभ्यास गटाची नियुक्तीच झाली नसून वीज मंडळ मोडीत काढण्यासाठीच सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असा आरोपही यावेळी करण्यात आला. सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, अन्यथा विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात मंत्र्यांना जागोजागी जाब विचारला जाईल, असा इशाराही आंदोलनातून देण्यात आला.
Web Title: Bjp Agitation Against State Government Allegation Of Load Shedding Cut Off Power Supply Nagpur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..