
नागपूर : ऋतुचक्रात बदल झाल्याने हवामान खात्याचे संगणकीय मॉडेल फेल ठरले आहे. त्यामुळे ऊन, पाऊस व थंडीचे अंदाज चुकले आहेत. सध्या पावसाचा हंगाम संपला असला तरी, अद्याप थंडी सुरू झालेली नाही. दिवाळीनंतरच थंडी मुहूर्त साधणार असल्याचे सांगितले जाते. मोसमी वारे महाराष्ट्रातून निघून गेले आहेत. मात्र, हवामानात बदल होत असल्याने अवकाळी पावसाचे संकट आहे. त्यामुळे थंडीचे आगमन लांबले आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतरच विदर्भात थंडी वाढेल, अशी शक्यता हवामान शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
जून ते सप्टेंबर पावसाचा हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबरपासून थंडीची चाहूल लागते. याच महिन्यात दिवसा तापमान वाढत असल्याने ‘ऑक्टोबर हीट’ही अनुभवायला मिळते. दिवसा उन्ह आणि रात्री थंडी असे वातावरण या दिवसांत असते. मोसमी वारे परतल्यानंतर बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात कमी दाबाचे पट्टे निर्माण होऊन विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अनेक भागांत १८ ऑक्टोबरपर्यंत तुरळक पाऊस झाला. अद्याप ढगाळ वातावरण कायम आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यानंतरच थंडीला सुरुवात होण्याची शक्यता हवामानतज्ज्ञ सुरेश चोपणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
काही वर्षांपासून पावसाचा कालावधी वाढत आहे. त्यामुळे ऑक्टोबरमधील तापमानवाढीची तीव्रताही कमी झाली. शिवाय थंडीलाही उशीर होत आहे. सध्याची स्थिती लक्षात घेता यंदाही नोव्हेंबरच्या मध्यानंतरच थंडी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भात उत्तरेकडून दक्षिणेकडे येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे थंडी वाढते. नोव्हेंबर महिन्यात हे वारे सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. थंडीचा कालावधी पूर्वी ऑक्टोबर ते जानेवारी असा होता. आता तो नोव्हेंबर ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वाढला आहे. सूर्य मकरवृत्ताकडे गेल्याने तांत्रिकदृष्ट्या थंडी सुरू व्हायला हवी, असेही चोपणे म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.