भंडारा : नागपूर, भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यांतील तब्बल २,५०,८०० हेक्टर जमीन ओलिताखाली आणणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे गोसेखुर्द. या प्रकल्पास ‘इंदिरा सागर’ असेही नाव आहे. १९८३ मध्ये उद्घाटन झाले त्यावेळी प्रकल्पाची किंमत ३७२.२२ कोटी होती. आज ती कित्तेक पटींनी वाढली असून, प्रकल्पाची बरीच कामे रखडली आहेत. वैनगंगेच्या काठावरील भंडारा शहराला नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गोसेखुर्द धरणात पाणी अडविल्यापासून त्यात नागपूरच्या नागनदीतून येणारे सांडपाणी साचते. ज्यामुळे धरणातील पाणी दूषित झाले. याच दृषित पाण्याचा पुरवठा शहरासह नदीकाठावरील लहान-मोठ्या गावांना होतो.
शहरातील कालबाह्य झालेल्या जीर्ण पाइपलाइनला ठिकठिकाणी गळती लागल्याने त्यातूनही दूषित पाणीपुरवठा होतो. गेल्या दोन वर्षांपासून नवीन वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम संथ गतीने सुरू असल्याने शुद्ध पाणी मिळणार कधी? असा प्रश्न स्थानिकांमधून विचारला जातो. शहरात आजही १० ते १२ वर्षांपासून कालबाह्य झालेल्या जलशुद्धीकरण यंत्रणेतून पाणीपुरवठा होतो. अनेक उपकरणे बंद आहेत. अशुद्ध, गढूळ, गाळमिश्रित पाण्याने नागरिकांमध्ये पटकी, कॉलरा, अतिसार, कावीळ आदी रोगांचे प्रमाण वाढले आहे. भंडारावासीयांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित असलेला हा प्रश्न प्राधान्याने सोडविणे स्थानिक लोकप्रतिनिधींचे आद्यकर्तव्य आहे.
दोन दशकांपूर्वी भंडारा शहरात निर्मित पितळी भांडी पूर्ण मध्य भारतात पुरविली जायची. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्यासह अनेक थोर पुरुषांनी या शहरात भेट दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तर याच ठिकाणाहून निवडणूक लढविली होती. त्यात त्यांचा पराभव झाला होता. अशा अनेक ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार असलेल्या शहरातील प्राचीन ठेवा जनत करणे गरजेचे आहे.
लोकसंख्या वाढली; जलशुद्धीकरणाची क्षमता ‘जैसे थे’
शहरात १९९२ मध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ६५ हजार नागरिकांना ९ लाख एमएलटी पाणीपुरवठ्याची होती. आजघडीला या केंद्राला २७ वर्षे झाली. शहराची लोकसंख्या एक लाखावर पोहोचली. मात्र, कालबाह्य जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता ‘जैसे थे’ आहे. १५ वर्षांपासून असलेली जलशुद्धीकरण यंत्रणा १२ वर्षांपूर्वी नियमानुसार कालबाह्य झाली. परंतु, या यंत्रणेची थातूरमातूर दुरुस्ती करून आजही शहरात पाणीपुरवठा सुरू असल्याने नागरिकांना गढूळ व गाळमिश्रित पाणी प्यावे लागते.
बेरोजगारांनी थाटला शुद्ध पाणी पुरविण्याचा व्यवसाय
दररोज होणाऱ्या दूषित पाणीपुरवठ्यामुळे शुद्ध पाण्याची कॅन विकत घेण्याची सवयच नागरिकांनी लावून घेतली. त्यामुळे बेरोजगार तरुणांनी थोडेफार कर्ज घेऊन गुंतवणूक करून आरओ सेंटर सुरू केले. रोज सकाळी नागरिकांना शुद्ध पाण्याची कॅन विकत घ्यावी लागते. नगर परिषदेकडून काही वॉर्डात आरओ प्लान्ट सुरू करण्यात आले. मात्र, सध्या जुन्या पाइपलाइनमधून अपुरा व दूषित पाण्याचाच पुरवठा होतो. शहराचा विस्तार आणि अन्य गोष्टींमुळे पाणीपुरवठा योजना स्थानिकांची गरज भागविण्यासाठी अपुरी ठरते. अशावेळी नगराध्यक्ष म्हणून जबाबदारी आल्यानंतर खासदार सुनील मेंढे यांनी भंडारा शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले.