.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
शितलवाडी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत ''मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'' हे स्पर्धात्मक अभियान पहिल्या टप्प्यात यशस्वी झाल्यानंतर त्याचा दुसरा टप्पा राज्य शासनाने हाती घेतला आहे. येत्या सोमवारी (ता.५) ते ४ सप्टेंबर या महिनाभराच्या कालावधीत हे अभियान राबविले जाईल.
त्यानंतर ५ ते १५ सप्टेंबर या काळात मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा आदी घटकांबाबत जागृती करून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना देण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी रविवारपर्यंत (ता.४ ) अभियानाची पूर्वतयारी करण्यात येईल. सोमवारी (ता.५) औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होईल. हे अभियान एक महिना कालावधीसाठी राहणार आहे.
२०२३-२४ मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा हे स्पर्धात्मक अभियान राज्यातील सर्व शाळांसाठी राबविण्यात आले होते. या अभियानाला विद्यार्थी व शिक्षकांबरोबरच विद्यार्थी, पालकांनी प्रतिसाद दिला.
या अभियानात तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर यशस्वी ठरलेल्या शाळांना रोख रकमेच्या स्वरूपात पारितोषिके देण्यात आली. त्या अभियानामुळे अनेक सकारात्मक बदल निदर्शनास आले. चाकोरीबाहेरील स्पर्धात्मक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होऊन त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळावी, असा मूळ उद्देश होता.
‘सुंदर शाळा’ या स्पर्धेमध्ये जिल्हातून रामटेक तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भिलेवाडा प्रथम पुरस्कार मानकरी ठरली होती. शाळा व परिसराचे सौंदर्यीकरण यासह अनेक बाबींचा समावेश होता. ‘माझी शाळा’मध्ये मागील वर्षी सहभाग घेतला होता.
जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये वाढ व्हावी, विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि सातत्यपूर्ण सर्वकष शिक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्व प्रकारच्या व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ''मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा'' अभियानाची अंमलबजावणी करण्यात आली.
या उपक्रमात शाळेतील भौतिक सोयी-सुविधा अद्यावत करणे, पोषण आहाराचा मेन्यू तयार करणे. ग्रंथालय, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. शिष्यवृत्ती परीक्षेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदविणे, विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढावी, या दृष्टिकोनातून स्पर्धा परीक्षा घेणे, हा हेतू होता.
पहिल्या टप्प्यांतील अभियानाच्या यशस्वीतेमुळे यंदा २०२४-२५ मध्येही ‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा टप्पा २'' हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
अभियानात सहभागी होणाऱ्या शाळांना पायाभूत सुविधांसाठी ३३ गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणीसाठी ७४ गुण व शैक्षणिक संपादणूकसाठी ४३ गुण, असे एकूण १५० गुण देण्यात येणार आहेत.
या अभियानासाठी शाळांची विभागणी शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा, अशा दोन वर्गवारीत करण्यात येणार आहे. प्रत्येक स्तरावरील विजेता या दोन्ह वर्गवारीसाठी स्वतंत्रपणे निवडण्यात येईल, असे शासनाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.