
Nagpur : देशातील २८ हजार गावांमध्ये ४ जी सेवा
नागपूर : देशातील अशा गावांमध्ये ज्या गावात कुठल्याही कंपनीच्या मोबाईलचे कव्हरेज किंवा सेवा उपलब्ध नाही अशा २८ हजार गावांमध्ये बीएसएनएलच्या माध्यमातून थेट ४ जी मोबाईल सेवा देण्याची सुरवात ‘४ जी सॅच्युरेशन प्रकल्पा’अंतर्गत करण्यात येणार आहे. अशी माहिती बीएसएनएल, नवी दिल्लीच्या कार्पोरेट कार्यालयाच्या मनुष्यबळ विभागाचे संचालक अरविंद वडनेरकर यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली.
बीएसएनएलच्या १९ व्या अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटनासाठी आले असताना पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, फोरजी मुळे येत्या वर्षभरात देशातील २८ हजार गावांना फायदा होणार आहे. जगामध्ये मोबाईल उत्पादक तसेच थ्री जी, ४ जी आणि ५ जी सेवा देणाऱ्या काही मोजक्याच कंपन्या आहेत. याच क्रमामध्ये भारतात सुद्धा थ्री जी, फोर जी आणि पाईव्ह जी टेलिकॉम सेवा देणारी मोबाईल कंपनी असली पाहिजे.
या उद्देशाने भारत सरकार प्रयत्न करत आहे. बीएसएनएलने सुरू केलेली ४ जी सेवा ही विश्वस्तरावरील राहणार आहे. या सेवेला ५ जी सेवेमध्ये रूपांतरित होण्याला वेळ लागणार नाही. सध्याचे ४ जी उपकरण ५ जी मध्ये अपडेट होतील, असेही वडनेरकर म्हणाले. यावेळी क्षेत्राचे महाव्यवस्थापक यश पान्हेकर उपस्थित होते.
राज्याचा २० टक्के महसूल
महाराष्ट्र सर्कलचे बीएसएनएलच्या एकूण महसूल आणि संकलनामध्ये जवळपास २० टक्के योगदान आहे.
रोहित शर्मा, मुख्य महाव्यवस्थापक, महाराष्ट्र टेलिकॉम सर्कल