आलेल्या राख्या पोहचणार का?

शहरात २८ लाख लोकसंख्येसाठी फक्त २६० पोस्टमन
postman
postman

नागपूर - भाऊ आणि बहिण यांच्यातील अतूट नाते आणि प्रेमाचे प्रतीक असणारा सर्व देशभरात साजरा केला जाणारा सण म्हणजे रक्षाबंधन. विवाहानंतर सासुरवाशीण झालेल्या बहिणीचे गाव अथवा शहर जर दूर असेल तर ती माहेरी येऊ शकत नाही. अशावेळी पोस्टाच्या माध्यमातून भावाला राख्या पाठवतात. पण पाठविलेल्या राख्या रक्षाबंधनाच्या दिवशी पोहचतातच असे नाही. याचे मुख्य कारण म्हणजे पोस्टमनची कमी असलेली संख्या. आज नागपूर शहराची लोकसंख्या २८ लाख असून केवळ २६० पोस्टमन कार्यरत आहेत. त्यामुळे शहरात लाखोंच्या संख्येने आलेल्या राख्या भाऊरायापर्यंत पोहचतात काय? हा मोठा प्रश्न आहे.

स्पर्धेच्या युगात जलद सेवेसाठी मोबाईल, ई-मेलबरोबरच कुरिअर सर्व्हिससारखे पर्याय उपलब्ध झाल्याने पोस्टात येणाऱ्या ग्राहकांची संख्यादेखील रोडावत चालली होती. पण सेवेपेक्षा कमी दरात टपाल पाठविण्यासाठी ही उत्तम आणि विश्वासार्ह सेवा आहे. अनेकांना नोकऱ्यांचे कॉल येऊनही ते मिळत नाहीत; टेलिफोन बिल भरण्याची अखेरची तारीख उलटून गेली तरी बिल भरता येत नाही, अशा एक ना अनेक तक्रारी पोस्ट ऑफिससंदर्भात आहेत. पण या सगळ्या समस्यांचे मूळ पोस्टमनची संख्या कमी असणे हेच आहे. दिवसेंदिवस वाढणारी वस्ती आणि त्यातुलनेत अगदी बोटावर मोजण्याइतके पोस्टमन असल्याने परिसरातील टपाल सेवेचे तीन तेरी वाजले आहे.

शहराचा भौगोलिक विस्तार वाढला. त्याप्रमाणात पोस्टमनची संख्या वाढणे आवश्यक होते. परंतु, तसे घडले नाही. १९९० मध्ये जेवढे कर्मचारी होते, पैकी अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या जागी नवीन कर्मचाऱ्यांची नेमणूक झालेली नाही. त्याचा परिणाम टपाल वाटपावर झालेला आहे. नागपूर शहरात ६६ पोस्ट ऑफिस आहेत. त्यापैकी २९ ठिकाणांवरून टपालाच्या वितरण व्यवस्था केली जाते. शहरासाठी ३३४ पोस्टमनची पदे मंजूर असून कार्यरत फक्त २६० पदे आहेत. त्यामुळे ग्राहकांना टपाल मिळण्यास विलंब होत आहे. भौगोलिक क्षेत्र वाढल्याने पोस्टमनला सध्या १५ ते १७ किलोमीटरपर्यंत २० ते ३० किलोच्या टपालाचे वाटप करावे लागत आहे. २५ ते ३० इमारतींमध्ये चढ उतारही करावी लागते. क्षमतेपेक्षा दुप्पट टपाल वाटप करावे लागत असल्याने ग्राहकांना टपाल मिळण्यास उशीर होतो, व त्याचा राग आमच्यावर निघतो, असे पोस्टमनचे म्हणणे आहे.

वजन वाढले

पोस्टमनकडे आंतरदेशीय, पाकिटे, पोस्टकार्ड यांची संख्या कमी झाली. मात्र, मासिक, म्युच्युअल फंडच्या विवरणांची संख्या वाढली आहे. विविध प्रकारच्या आर्थिक गुंतवणुकीच्या विवरणांचे वाटप सुरू झाले आहे. त्याचप्रमाणे आधार कार्ड, पासपोर्टच्या संख्येतही वाढ झाली असून पार्सलच्या संख्येत वाढ झाली आहे.

आकडे बोलतात

  • ३३४ - पोस्टमनची मंजूर पदे

  • २६० - कार्यरत पद

  • ६६ - पोस्ट ऑफिस

  • २९ - टपाल कार्यालये

  • १०० ते १२५ - एका पोस्टमवरील

  • टपालाचा भार

  • १५ ते १७ किलो मिटर - टपाल वाटपाचा परिसर

  • २० ते ३० किलो - टपालाचे वजन

  • ४० ते ५० हजार - शहरातील दररोजचे टपाल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com