नागपूर : सध्याच्या रचनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध; प्रभाग दोन सदस्यांचा होणार?

प्रभाग रचना आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे आल्याने आता प्रभाग रचनाही बदलली जाणार
नागपूर : सध्याच्या रचनेला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विरोध; प्रभाग दोन सदस्यांचा होणार?

नागपूर : प्रभाग रचना आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्याचा अधिकार राज्य शासनाकडे आल्याने आता प्रभाग रचनाही बदलली जाणार आहे. सध्याच्या तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा विरोध असल्याने दोन सदस्यीय प्रभाग पद्धती करण्याची मागणी जोर धरत आहे.

दोन सदस्यीय प्रभाग पध्दतीची निवडणूक दोन्ही कॉंग्रेसला फायदेशीर ठरू शकते तर भाजपची धाकधूक वाढू शकते. काँग्रेसने सुरवातीपासून एक सदस्यीय वॉर्ड पद्धतीने निवडणूक घेण्याची मागणी केली होती. काँग्रेसच्या आग्रहामुळे चार सदस्यीय प्रभाग पद्धती बदलण्याचा ठराव विधानसभेत संमत करण्यात आला होता. प्रत्यक्षात महापालिकेची निवडणूक जवळ येताच सर्वच पक्षाच्या प्रतिनिधींनी राजकीय फायद्या-तोट्याचे गणित मांडणे सुरू केले.

बराच खल झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय जाहीर केला. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. पालकमंत्री नितीन राऊत आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही कडाडून विरोध दर्शविला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही नाराजी दर्शवली होती.

पालकमंत्री नितीन राऊत यांनी तर घटनेचे दाखले देत बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला न्यायालयात आव्हान देण्याचा इशाराही दिला होता. तत्पूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाच्या विरोधात आपली बाजू मांडण्याची तयारी केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कोणाचेच ऐकले नाही. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होईल, असे जाहीर करून त्यावर शिक्कामोर्तब केले. महाविकास आघाडीत वाद नको म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नंतर मुख्यमंत्र्यांच्या होकारात होकार मिळवला होता.

आता ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्यायच्या नाही, असा निर्णय सरकाराने घेतला. त्याकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा आणि प्रभाग रचना करण्याचे विधेयक विधानसभेत सादर केले. त्याला एकमताने मंजुरी मिळाली आहे.

महापालिकेचे चित्र बदलणार

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कुठलाही आक्षेप न घेता विनाविलंब या विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेली प्रभाग रचना रद्द समजावी, असे पत्र जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना पाठविले. ही संधी साधून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करणे सुरू केले आहे. एकचा किंवा जास्तीत जास्त दोन सदस्यांचा एक प्रभाग अशी रचना करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे पुन्हा महापालिकेचे चित्र पुन्हा बदलणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com