Nagpur : नक्षल चळवळीचा अंत लवकरच ; उपमहानिरीक्षक संदीप पाटील

अर्बन नक्षलवादच मोठी समस्या
उपमहानिरीक्षक संदीप पाटील
उपमहानिरीक्षक संदीप पाटीलsakal

नागपूर : गडचिरोलीतील स्थानिक नागरिकांचा आता नक्षलवाद्यांवर विश्‍वास राहिलेला नाही. पोलिस यंत्रणेची उपस्थिती आणि विकास प्रक्रियेला आलेला वेग पाहता नक्षलवादाचा अंत लवकरच होईल, असा विश्‍वास गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी व्यक्त केला.

‘सकाळ’ कार्यालयात दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी संवाद साधला. संदीप पाटील म्हणाले, माओवादी कम्युनिस्ट पार्टी अस्तित्वात आल्यानंतर २००४ पासून देशात नक्षल कारवाया वाढल्या. २००९ मध्ये त्यात भीषणता आली.

त्यामुळे सरकारने प्रारंभिक उपाययोजना करण्यास सुरुवात केली. त्यातून दुर्गम भागात चौक्या स्थापन करण्याचे काम सुरू झाले. गेल्या काही वर्षांमध्ये नक्षलवाद्यांची कोंडी करून विविध कारवाया करण्याचे काम सुरू असल्याने बऱ्यापैकी त्यांच्यावर नियंत्रण मिळविण्यात यश आले.

त्यातूनच गडचिरोली भागात सध्या ६० चौक्या कार्यरत आहेत. आता गडचिरोलीऐवजी छत्तीसगड भागात नक्षल्यांचे वास्तव्य आहे. ते वास्तव्य संपविण्यासाठी त्या भागात मोठ्या प्रमाणात कारवाईची गरज आहे.

त्यासाठी केंद्र सरकरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, गडचिरोलीतील नक्षलवादापेक्षा शहरी भागातील नक्षलवाद अधिक प्रभावी आणि घातक असल्याचे ते म्हणाले. यातील काही बड्या नेत्यांवर कारवाई झाल्याने त्यावर काही प्रमाणात वचक बसला आहे. मात्र, आजही त्यांच्यातील बरेच जण सक्रिय असून, त्यांच्यावर नियंत्रण मिळविणे हे यंत्रणेपुढील मोठे आव्हान असल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक संदीप भारंबे यांनी त्यांचे स्वागत केले.

आंबेडकरांची क्रांती मोठी

देशात माओवाद रुजविण्यासाठी अनेक बुद्धिजीवी वर्ग सरसावताना दिसतो. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या हाती असामान्य ताकद दिली. ही जगातील सर्वश्रेष्ठ क्रांती आहे. आणखी दुसऱ्या क्रांतीचा विचार करण्याची काय गरज आहे. लोकशाही मूल्यांच्या माध्यमातूनही आपण आपले हक्क मिळवू शकतो, असे पाटील यांनी यावेळी नमूद केले.

नक्षलवादाला स्थानिकांचा आधार नाही

गेल्या काही वर्षांमध्ये गडचिरोलीत कार्य करीत असताना स्थानिकांना सरकारच्या विविध योजना उपलब्ध करून देण्यासाठी काम केले. यामध्ये आधारकार्ड, बॅंकेचे खाते आणि त्यातून विविध शासकीय योजना मिळाल्याने विकासकामांना जनतेचीही साथ मिळत आहे.

त्यामुळे आता येथील नागरिकांनी नक्षलवादाला दूर करीत, विकासाला जवळ केल्याचे चित्र दिसून येत असल्याचे संदीप पाटील यांनी सांगितले. याशिवाय तरुणांच्या रोजगारासाठीही पोलिस प्रयत्नशील असल्याने त्यांची साथ मिळत असल्याचे ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com