
नागपूर : तालिबान्यांचे समर्थन इम्रान खान यांना भोवले
नागपूर : अफगानिस्तानमध्ये तालिबानी सरकार आले. परंतु जगातील कोणत्याही राष्ट्राने या सरकारला मान्यता दिली नाही. परंतु तालिबान्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणी जनता गुलामगिरीतून मुक्त झाली असे वक्तव्य केले. पाकिस्तानात निर्माण झालेल्या परिस्थितीसाठी काही प्रमाणात इम्रान खान यांचे तालिबानी प्रेमही जबाबदार असल्याचे परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक व ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांनी नमूद केली. विविध शेजारीला राष्ट्रांमधील तणावाची स्थिती बघता त्यांनी मतभेद असले तरी शेजारी राष्ट्रांसोबत संबंध चांगलेच असावे, अशी पुष्टीही जोडली.
प्रेस क्लब नागपूरतर्फे भारत-पाकिस्तान आणि रशिया-युक्रेन तणावपूर्ण संबंधावर प्रेस क्लबमध्ये ज्येष्ठ पत्रकार जतिन देसाई यांचे भाषण आयोजित करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संपादक एस. एन. विनोद, प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र उपस्थित होते. देसाई यांनी पाकिस्तान-भारत संबंध नेहमीच तणावपूर्ण असले तरी अनेकदा आशेचा किरण दाखवणाऱ्या घटनाही घडत असतात असे सांगितले. भारत-नेपाळमधील संबंधात २०१५ पासून तणाव आहे.
दक्षिण आशियात भारताचे सर्व राष्ट्रांशी संबंध चांगले असले तरी चीनचा प्रभाव आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. चीन व तायवानमधील संबंधातही तणाव आहे. तायवान हे स्वतंत्र राष्ट्र आहे, याला मान्यता मिळू नये, अशी चीनची भूमिका आहे. गेल्या काही महिन्यात चीनने तायवानच्या एअरबेसमध्ये विमाने पाठवली होती. चीनचे आधीपासूनच विस्तारवादी धोरण असून रशियाही याच धोरणाचा अवलंब करीत आहे. २०१४ नंतर युक्रेनमध्ये मोठी क्रांती झाली. तत्कालीन अध्यक्ष रशियाचे समर्थक होते. पुतीन यांना युक्रेन नाटोचा सदस्य होऊ नये, असे वाटत होते.
भारताची तटस्थ भूमिका
रशियाच्या सीमेवर सुरक्षेच्या दृष्टीने नाटो राष्ट्र नको, अशी त्यांची भूमिका आहे. नाटोतील एका देशावर हल्ला केल्यास तो संपूर्ण नाटोवरील हल्ला समजण्यात येते, ही नाटोची घटना रशिया-युक्रेनच्या युद्धासाठी कारणीभूत ठरली, असेही त्यांनी सांगितले.
भारताने रशियाचा निषेध करणे कठीण होते. परंतु भारताने एकीकडे रशियासोबत इंधनासाठी व्यवहार केला तर दुसरीकडे रशियाचा उल्लेख न करता बुचा किलिंग घटनेचा निषेध केला. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगातून रशियाला काढण्याच्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या निर्णयावर भारताने तटस्थ भूमिका घेतली. गेल्या दहा दिवसांत विविध देशाचे मंत्री भारतात आले. भारताने उघडपणे रशियाविरोधात भूमिका घ्यावी, अशी इतर राष्ट्राची इच्छा आहे. त्यामुळे भारतापुढे मोठे आव्हान उभे झाले असल्याचेही त्यांनी नमुद केले.
Web Title: Nagpur Imran Khan Taliban Support Jatin Desai Need Good Relation Neighboring Nation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..