नागपूर : शहरात वीज पुरवठा खंडित होण्याचे सत्र सुरूच असून महावितरणचे ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाहक उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. आज, बुधवारी शहरातील बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना उकाडा सहन करावा लागला.
नंदनवनच्या काही भागात मंगळवारपासून रात्रभर वीज पुरवठा खंडित होता. तो बुधवारपर्यंत कायम राहिला. त्याचप्रमाणे मानेवाडा, महालक्ष्मीनगर तसेच दक्षिण आणि मध्य नागपूरचा काही भागात वीज पुरवठा बुधवारी खंडित झाला. शहरातील तापमान ४५ अंशाच्यावर गेले होते. मे महिन्यातील तापमान नागरिकांना कुलर, पंख्याविना राहणे असह्य होते. लहान मुले, वृद्धांना उकाड्याचा प्रचंड त्रास होतो. अशा परिस्थिती वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी महावितरण विरोधात मोठा संताप व्यक्त केला आहे.
महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मॉन्सूनची पूर्व तयारी नसल्याने मंगळवारी किरकोळ पावसाने महावितरणची पोलखोल झाली. शहरातील तब्बल ४० विद्युत खांब पडले. तर वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच वीज वाहिन्यांवर झाडे पडल्यामुळे वीज यंत्रणेचे नुकसान होऊन वीज पुरवठा प्रभावित झाला. मान्सूनपूर्व कामाचे नियोजन नसल्याने किरकोळ पावसात महावितरणची दाणादाण झाली. बुधवारी मानेवाडा भागात भूमिगत केबलमध्ये बिघाड झाल्याने महालक्ष्मीनगर व परिसरातील वीज पुरवठा खंडित झाल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.