आता डोके फोडून रक्त शिंपडावे काय, सोयाबीन उत्पादक व मजूर हतबल

पारशिवनीः विविध रोगांमुळे सोयाबीन पिकाची झालेली अवस्था.
पारशिवनीः विविध रोगांमुळे सोयाबीन पिकाची झालेली अवस्था.

पारशिवनी (जि.नागपूर) : औंदा सोयाबीनचे पीक होणार, दोन पैसे हाती येणार, ही आशा असल्याने यावर्षीं तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. सोयाबीन पिकांचे क्षेत्रफळ१३०० हेक्टर होते. शिवारात सोयाबीनचे हिरवेगार पीक बहरू लागले. आता सोयाबीनचे पीक होईल, पण पावसाने नाकीनऊ आणले. नको तेव्हा पावसाने धोधो धुतले. उरलेले काम येलो, मोझॅक, खोडकीड आणि इतर किडीच्या प्रादुर्भावाने  केले. त्यात सोयाबीन पूर्णतः वाया गेले. खरिपाचे पहिले पीक सोयाबीन न कापता जनावरांना चाऱ्यासाठी शेतात सोडावे लागले. कारण सोयाबीन कापणीला परवडणारे राहीले नाही. मजुरांचा हंगाम पाहता पाहती खाली गेला. अशी व्यथा शेतकरी  व मजुरांच्या वाट्याला आली आहे.

अधिक वाचाः कुटुंबीय निघाले होते लग्नाच्या गाठी जोडायला, पण बालसंरक्षण अधिकाऱ्यांना लागली कुणकुण
 

२०० ते३०० रुपये मजुरी गेली
पारशिवनी भागात दरवर्षी मध्यप्रदेश, भंडारा, गोंदिया या भागातून मजूर या हंगामात सोयाबीन कापणीसाठी येत असतात. प्रतिएकर १६०० ते२००० रुपये मंजुरी मिळते.  यावर्षी सोयाबीन पीक नष्ट झाल्याने रोजगारावर गदा आली. एकतर सोयाबीनचा उत्पादन खर्च बुडाला. त्यात शेतकऱ्यांना वेदना त्या वेगळ्याच. मागील वर्षी सोयाबीन कापणीला २०० ते३०० रुपये मजुरी होती. आज मजुरांची मजुरीही गेली. शेतकऱ्यांना आशा होती की सोयाबीन होणार एकरी आठ-दहा पोती तरी घरी येईल. सोयाबीनच्या झाडांना भरभरून शेंगा लागल्या होत्या. शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. पण निसर्गाच्या असमतोलपणाचा झटका व रोगराई आल्याने सोयाबीन पीक हातून गेले. एक पोते सुद्धा सोयाबीन होईल की नाही, याचीही शाश्वती नाही. बियाण्यांची खरेदी, पेरणीचा खर्च, तणनाशक व अन्य औषध फवारणींसह कापणी तसेच काढणीच्या रकमेची गोळाबेरीज केली तर ‘ तेलही गेले आणि तूपही गेले, हाती धुपाटणे आले’ अशी परिस्थिती आली. इतर भागात काम नसल्याने रोजगारही मिळेनासा झाला आहे. तरी शासनाने या नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजुरांना आधार द्यावा, अशी मागणी पारशिवनी तालुक्यातील  शेतकऱ्यांमधून होत आहे.

अधिक वाचाः लाखो रुपयांचे धानपीक खराब, कारण काय तर बोगस बियाणे
 

उपासमारीची आली वेळ
उधारवाडी तसेच होते नव्हते जवळ असलेले पैसे खर्च करुन बीबियाणे खरेदी केले. सोयाबीन पेरले. पण निसर्गाचा प्रकोप, रोगराईने हाती येणारे पीक पूर्ण नष्ट केले. धानावर रोग आहे. कापसाचे काही खरे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येण्याची  शक्यता निर्माण झाली आहे.
सागर सायरे
शेतकरी

शेवटी निराशा झाली !
सोयाबन लावली ती शेतात बहरली.  सोयाबीन पिकेल हाती पैसा येईल ही आशा असताना पावसाने सोयाबीनला धुऊन काढले. ते होत नाही तर मोझॅक, खोडकिड आणि इतर किडीच्या प्रादुर्भावाने पीक संपूर्ण नष्ट झाले. त्यामुळे डोके फोडून रक्त शिंपण्याची वेळ आली आहे.
सुरेश भगत
शेतकरी, कंरभाड

 संपादनः विजयकुमार राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com