Video : राष्ट्रासाठी बाबासाहेबांचे विचार ‘होकायंत्र’च! कवी महेंद्र गायकवाड यांनी मांडली दलित साहित्याबद्दलची भूमिका

Poet Mahendra Gaikwad introduced the role of Dalit literature
Poet Mahendra Gaikwad introduced the role of Dalit literature

नागपूर : दलित साहित्याने मराठी साहित्यात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. नवे अनुभव आणि नवे संवेदनाविश्‍वामुळे दलित साहित्याची मराठी साहित्यात सर्वांगाने चर्चा होऊ लागली. विविध साहित्यसंमेलने, साहित्य चर्चांमधून दलित साहित्यसंबंधाची सैद्धांतिक मांडणी होऊ लागली. दलित साहित्य हे दलित असते काय, इथपासून ‘दलित’ हा शब्द एखाद्या विशिष्ट जातीपुरता योजला जातो काय, आदी प्रश्‍न दलित साहित्याच्या संदर्भात विचारले जाऊ लागले. कवी, साहित्यिक महेंद्र गायकवाड यांनी मात्र या प्रश्‍नांना सडेतोड उत्तरे देऊन हा वादच निकाली काढण्याचा प्रयत्न केला.

‘भेटी लागे जीवा’ या सदरांतर्गत गायकवाड यांच्या ‘अखिल भारतीय दलित संमेलनाची दहा अध्यक्षीय भाषणे’ आणि ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक मुलाखती’ या दोन नवीन येत असलेल्या पुस्तकांवर ‘सकाळ’ कार्यालयात त्यांच्याशी बातचित घडून आली. स्वतंत्र बाणा असलेल्या दलित साहित्याने कथा, कविता, आत्मकथन, नाटक, संशोधन, समीक्षा आदी सामाजिक, वैचारिक लेखणाने नवे परिमाण, नवे आयाम दिले. तरी दलित साहित्य आणि आंबेडकरी साहित्यात फरक काय? दलित साहित्य चळवळीची अविभाज्य घटक असलेल्या दलित नाटकाने आतापर्यंत काय साध्य केले?तिची पाळेमुळे किती समृद्ध झाली? दलित रंगभूमीने जनमानसावर कितपत राज्य केले? दलित रंगभूमीवरील पात्रांनी आपल्या अभिनयाची किती उंची वाढविली? कालची रंगभूमी आणि आजची नाटके यात कितपत तफावत आहे? दलित रंगभूमीच्या काहीकाळच्या नाटककाराला दलित नाट्य का नकोसे झाले? आदींचा उहापोह महेंद्र गायकवाड यांनी त्यांनी संपादित केलेल्या ‘अखिल भारतीय दलित संमेलनाचे दहा अध्यक्षीय भाषणे’ या पुस्तकातून नमूद केल्याचे सांगितले.

भि. शि. शिंदे, मधुसुदन गायकवाड, प्रा. दत्ता भगत, प्रेमानंद गज्वी, प्रा. अविनाश डोळस, रामनाथ चव्हाण, प्रा. विजयकुमार गवई, प्रभाकर दुपारे, विठाबाई नारायणनायगावकर यांच्या संमेलनातील भाषणांतून दलित नाट्यचळवळीची सशक्त भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

भारतीय दलित साहित्य १९६०च्या दरम्यान आविष्कारले  गेले. तळागाळातील प्रत्येक माणूस दलित साहित्याचा केंद्रबिंदू आहे. मानवी मूल्ये नि मुक्तीचा उद्घोष करणारे दलित साहित्य जागतिक पातळीवर गेले. सृजनशील, संवेदनशील असलेले दलित साहित्य प्रस्थापीत मराठी साहित्याचे कर्दनकाळ  ठरले. वेदना आणि नकाराचे समीकरण मांडले. विषमतावादी वाझोटया परंपरेला कालबाह्य ठरविणाऱ्या दलित साहित्यामुळे समग्र मराठी  साहित्याच्या कक्षा रुंदावल्यात, असे गायकवाड यांनी स्पष्ट करताना सांगितले.

दुसऱ्या पुस्तकात गायकवाड यांनी डॉ.बाबासाहेबांच्या दुर्मिळ मुलाखतीतून थेट दलित साहित्य व एकंदरित आंबेडकरी चळवळीचा गाभाच वाचकांसमोर ठेवला आहे. या मुलाखतींमधून बाबासाहेबांचे शैक्षणिक धोरण व त्यांची उद्दिष्टे, वैचारिक संघर्ष, समानतेचे हक्क, अपृश्‍यांच्या विरोधात कॉंग्रेसची भूमिका, लोकशिक्षण वृत्तपत्रांचा हेतू, बौद्ध संस्कृतीचा गौरव, धर्मांतरानंतर वार्तालाप, गांधीजींच्या भूमिकेबद्दल बाबासाहेबांचे उद्दिष्ट यांवर प्रकाश टाकण्यात आल्याचे महेंद्र गायकवाड यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com