नागपूर : निराधारांच्या खात्यात खडकूही नाही

संजय गांधी ‘निराधार’ योजनेचा बट्ट्याबोळ; १५ महिलांची सहा महिन्यांपासून भटकंती
Nagpur news
Nagpur newssakal

नागपूर : ७५ वर्षीय वामन गणपतराव गाडगे पत्नीसह जयताळा परिसरातील एकात्मता नगरात राहतात. सहा महिन्यांपासून त्यांची पत्नी अर्धांगवायूने आजारी आहे. घरी करणारे दुसरे कुणीच नसल्याने वामनराव सदैव पत्नीच्या सेवेत असतात. यामुळे उदरभरण आणि पत्नीच्या औषधपाण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी निराधार कार्ड बनवले. श्रावण बाळ योजनेंतर्गत त्यांना टोकनही मिळाले. परंतु प्रत्यक्ष निधीचा लाभ मिळाला नाही. आजारी पत्नीला घरी ठेवून शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवून नाकी नऊ आल्याचे ते सांगतात.

ऐन पस्तिशीत डोक्यावरील पतीचे छत्र हरवल्याने लहान दोन मुलांचा सांभाळ करायचा कसा, हा यक्षप्रश्न सुनीता गोडबोले यांच्यापुढे आहे. मुलांना घरी सोडून त्यांना बाहेर कामाला जाता येत नाही. घरी थांबायचे म्हटले तर पोटाचा प्रश्न कसा सोडवावा, हा प्रश्न आहे. त्यांनीही संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करून कार्ड बनवून घेतले. परंतु अद्याप खडकूही त्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत सरिता करणरवार यांच्या पतीचे निधन झाले. दोन्ही मुलींचे लग्न झाल्याने आता त्या एकट्याच आहेत. आयुष्यभर राब राब राबलेल्या हातांमध्ये आता काम करण्याची शक्तीच नाही. निराधार निधीतून कसाबसा उदरनिर्वाह करावा म्हणून त्यांनी कार्ड बनवले. परंतु अद्याप त्यांच्या खात्यावर झिरो बॅलन्स आहे. हजार रुपये कसेही मिळाले तर बरे झाले असते, अशी कैफियत त्यांनी बोलून दाखवली.

हे आहेत संजय गांधी निराधार योजनेचे कार्डधारक. योजनेचे कार्ड बनवूनही एक दोन नव्हे तर तब्बल १५ जणांच्या खात्यात गेल्या सहा महिन्यांपासून छदामही जमा झालेली नाही. रोजी बुडवून, चिल्यापिल्यांना दुसऱ्यांच्या भरोशावर ठेवून पाच-सहा किलोमीटरची तंगडतोड करून आजही (ता. ८) त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. परंतु कर्मचारी संपावर असल्याने कुणाचीच भेट झाली नाही. दरवेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक दिली जाते. हर शुक्रवार आमचा असाच जातो जी, अशी विवंचना पीडितांनी ‘सकाळ’ प्रतिनिधीकडे मांडली.

जयताळा, एकात्मतानगर ही गरिबांची वस्ती. सहा महिन्यांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते सचिन लोणकर यांनी शिबिराचे आयोजन करून गरजूंना निराधार योजनेचे कार्ड बनवून दिले. परंतु तेव्हापासून एकदाही त्यांना निधीचा लाभ मिळाला नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी सर्वच लाभार्थी प्रत्येक शुक्रवारी ते जिल्हाधिकारी कार्यालय गाठतात. परंतु त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागते. संजय गांधी निराधार अनुदान समितीचे काम ज्यांच्याकडे आहे ते उडवाउडवीची उत्तरे देतात. सध्या त्या सुटीवर असून, स्वतःचा चार्ज त्यांनी कुणाकडे दिला, याबाबत कुणीच माहिती दिली नसल्याचे माया प्रकाश तभाने, लीलाबाई गेडाम, ज्योती प्रकाश दगडे, पुष्पा कालसर्पे, शीतल बिरोळे, रंजना बनकर, नंदशीलाबाई कुळमेथे, नेरलीबाई टेकाम, कलीबाई करनाके, शामाबाई करनाके, लीलाबाई धोपेकर आदींनी सांगितले.

सारेच गौडबंगाल

निराधार योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात सक्रिय असलेल्या दलालांकडून चार ते पाच हजार रुपये घेतले जातात. दलालांकडून गेलेली प्रकरणे त्वरित मंजूर होतात. परंतु आम्ही शिबिराचे आयोजन करून खऱ्या लाभार्थ्यांना मदत देण्याचा प्रयत्न करतोय तर ही प्रकरणे मंजूरच होत नाही, असा आरोप सचिन लोणकर यांनी केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com