
नागपूर : कोरोनाची लागण होणारच नाही, या आर्विभावात शहरभर फिरणाऱ्यांना सावध होण्याची गरज व्यक्त करणारी आकडेवारी पुढे आली आहे. आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूपैकी 41 टक्के मृत व्यक्ती कोरोनाबाधितांच्या संपर्कातच आले नव्हते. त्यामुळे कुठलीही पार्श्वभूमी नसताना कोरोना एखाद्या व्यक्तिला मृत्यूच्या दारात नेऊ शकतो, हे स्पष्ट झाले आहे.
बाधितांच्या संपर्कात आल्याने मृत्यूमुखी पडलेल्यांची टक्केवारी 23 आहे. या आकडेवारीने संपर्कात आल्याने मृत्यू होईलच किंवा संपर्कात न आल्याने मृत्यू होणारच नाही, असा समज खोडून काढला आहे.
महापालिकेने 15 जुलैपर्यंत शहरातील कोरोनाबाधित आणि मृत्यूची आकडेवारी स्पष्ट केली. 15 जुलैपर्यंत शहरात 2002 कोरोनाबाधितांची नोंद असून 22 मृत्यू झाले आहेत. महापालिकेच्या हद्दीत झालेल्या मृत्यूच्या आकेडवारीने कोरोनाबाबत गंभीर नसलेल्या नागरिकांच्या डोळ्यात अंजण घालण्याचे काम केले आहे.
महापालिकेने वेगवेगळ्या पद्धतीने आकडेवारी दिली. यात कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा मृत्यू आणि संपर्कात नसलेल्यांचाही झालेला मृत्यू धडकी भरविणारा आहे. कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याची पार्श्वभूमी असलेल्या 23 टक्के नागरिकांचा मृत्यू झाला. कोरोनाबाधितांच्या कुठेही संपर्कात न येताही मृत्यूमुखी पडलेल्यांची टक्केवारी 41 टक्के आहे.
मृत्यूमुखी पडलेले 36 टक्के नागरिक कोरोनाबाधितांच्या संपर्कात होते की नाही? याबाबत काहीही स्पष्ट होऊ शकले नाही. सातत्याने वाढत्या मृत्यूमुळे नागरिकांनी कोरोनाबाबत आणखी सजग होण्याची गरज आहे.
उपचारासाठी गेल्यानंतर
दोन दिवसांत 12 जणांचा मृत्यू
कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल झालेल्यांचा दोन दिवसांत मृत्यू झाल्याची धक्कादायक बाबही आकडेवारीतून पुढे आली आहे. उपचारासाठी आल्यानंतर दोन दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्या कोरोनाबाधितांची संख्या 12 आहे. कोरोनाला गांभीर्याने न घेतल्याने नागरिक संकट ओढवून घेत असल्याचे दिसून येत आहे. उपचारासाठी आल्यानंतर 3 ते 5 दिवसांत मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 3 तर 6 ते 9 दिवसांत 5, नऊ दिवसांपेक्षा जास्त उपचार घेऊनही मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 2 आहे.
लक्षणे आढळल्यानंतर
पाच दिवसांत सर्वाधिक 10 मृत्यू
कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी बाधितांना रुग्णालयात दाखल करण्यात येते. लक्षण आढळून आल्यानंतर उपचार घेत असलेल्या 10 कोरोनाबाधितांचा पाच दिवसांत मृत्यू झाला तर दोन दिवसांत 8 जण मृत्यूमुखी पडले. नऊ दिवसांत तिघे तर नऊपेक्षा जास्त दिवस उपचार घेतल्यानंतर एकाचा बळी गेला. त्यामुळे नागरिकांनी सर्वप्रथम लवकरात लवकर डॉक्टरांना भेटून तपासणी करून घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. परंतु कुणीही मास्क घालत नाही. एका दुचाकीवर दोन, तीन जण आढळून येत आहे. हे चित्र लॉकडाऊनबाबत गांभीर्याने विचार करायला लावणारे आहे. मृत्यू दर रोखण्यासाठी नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे. एवढेच नव्हे तर आरोग्याच्या तपासणीवर भर द्यावा. थोडाही विलंब झाल्यास जीवावर बेतण्याची शक्यता आहे.तुकाराम मुंढे, आयुक्त, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.