नागपूर : पावसाळ्याच्या प्रारंभी भाज्यांचे भाव गगनाला भिडलेले असताना जिल्हाच्या ग्रामीण भागातील बाजारपेठेत मोठया प्रमाणात रानभाज्या दाखल झाल्या आहेत. या रानभाज्या आरोग्यवर्धकही असतात. रानभाज्यांच्या विक्रीतून आदिवासींच्या संसाराचा गाडा हाकला जात असतो.
विदर्भातील विविध जिल्ह्यातील ग्रामीण भागातील स्थानिक बाजारपेठेत भारंगी, टाकळा, फोडशी, पोकळा, करटोली, केनी, कवला, मायाळू, या भाज्या हमखास हजर झाल्या आहेत. तरूण पिढीला या पालेभाज्यांबद्दल फारशी माहिती नसल्याने हा गावरान मेवा दुर्लक्षित राहतो. जिल्हाच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात या गावरान मेव्याने जागा घेतली आहे. ग्रामीण भागात त्यांचा स्वादही चाखून झाला असला तरी शहरी भागात त्या भाज्या कशा बनवाव्यात याबद्दल फारशी माहिती नसल्याने हा आरोग्यवर्धक रानमेवा दुर्लक्षित राहतो .
विशिष्ट मोसमात उपलब्ध होणारी फळं आणि भाज्या यांचा आहारात समावेश करावा, असे आहारशास्त्र सांगते. त्यामुळे या भाज्यांचे आरोग्याच्या दृष्टीने महत्व आहे. पावसाळ्यात भाज्यांचा तुटवडा असताना केवळ फ्लॉवर, कोबी, बटाटे, सिमला मिरची, तोंडली, चवळी, कारली आदी भाज्या येत असल्या तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर करण्यात येतो त्यामुळे अशा भाज्या आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम करतात. तर दुसरीकडे सेंद्रीय भाज्यांचे गगनाला भिडलेले असतात.
रानभाज्या डोंगर उतार, झुडूपांमध्ये वा स्वच्छ माळरानात असतात.
रानभाज्या निसर्गाच्या वातावरणात तयार होत असल्याने आरोग्याला फलदायी ठरतात.
विषारी-बिनविषारी
रानभाज्यांतील काही भाज्यांमध्ये विषद्रव्ये असतात. ती नेमकी ओळखता आली नाहीत, तर त्यातून संसर्ग होण्याची शक्यता असते. भाज्या काढल्यावर त्यात खडे मीठ घालून उकळवून घेतल्या जातात. तर, काही रानभाज्यांच्या देठाकडचा चीक काढूनच त्या शिजवल्या जातात. या भाज्यांचा रंग, वास आणि आकार यावरून ते विषारी-बिनविषारी म्हणून ओळखले जाते. रानभाज्यांमध्ये काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात.
पौष्टिक गुणधर्म
रानभाज्यांसाठी रानोमाळ भटकंती
पावसाच्या आगमनाबरोबर या डोंगराळ भागात रानभाज्या दिसायला लागतात. टाकळा, भारंगा, कुडा, शेवळा आदी रानभाज्या सध्या विक्रीसाठी येत आहेत. तर थोड्याच दिवसात तयार झाल्यावर भोवरीची व आळूची पाने, करटोळी यासह अन्य भाज्या विक्रीसाठी आणल्या जातील. बेसुमार होत चाललेली जंगलतोड, जंगलात लावले जाणारे वणवे यामुळे रानभाज्या शोधण्यासाठी खूप वेळ जातो. घरची मुले व पुरुष रानोमाळ भटकून रानभाज्या गोळा करतात. तर आम्ही बाजारात त्यांची विक्री करतो.
पार्वती वाळवी, विक्रेता महिला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.