Vidarbha News : विदर्भात पुन्हा गारपीट, अवकाळीचा फटका ; अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा,अकोला जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान

राज्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. या वाऱ्याच्या परिणामामुळे विदर्भात सोमवारी रात्री आणि मंगळवारी नागपूर, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, अकोल्यात वादळी पावसासह काही भागात गारांचा तडाखा बसला. या अवकाळी पावसाने गहू, कांद्यासह आंबा व संत्रा या फळपिकांचे मोठे नुकसान केले आहे.
Vidarbha News
Vidarbha News sakal

नागपूर : राज्यात बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे येत आहेत. या वाऱ्याच्या परिणामामुळे विदर्भात सोमवारी रात्री आणि मंगळवारी नागपूर, अमरावती, वाशीम, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, अकोल्यात वादळी पावसासह काही भागात गारांचा तडाखा बसला. या अवकाळी पावसाने गहू, कांद्यासह आंबा व संत्रा या फळपिकांचे मोठे नुकसान केले आहे. ऐन उन्हाळ्यातील या पावसाने शेतकरी हतबल झाला आहे. तर ऐन निवडणुकीच्या काळात आलेल्या या नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. या पावसामुळे पाडवा पहाट, आणि नववर्षाची मिरवणूक, प्रचार करणारे कार्यकर्ते यांची तारांबळ उडाली.

नागपूर : शहरात मंगळवारी सकाळी पाऊस पडला तर नरखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली. गारपिटीने मका आणि गव्हालाही फटका बसला. संत्री, मोसंबी आणि आंबे गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

अमरावती : गारपिटीचा वरुड व चांदूरबाजार तालुक्यास जोरदार फटका बसला. मंगळवारीही विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. या अवकाळी पावसाने गहू, कांद्यासह आंबा व संत्रा या फळपिकांचे मोठे नुकसान केले आहे. वरुड व चांदूरबाजार या दोन्ही तालुक्यांत बहुतांश भागात मोठ्या बोराच्या आकाराची गारपीट झाल्याने काढणीवर आलेला गहू झोपला तर संत्रा व आंब्यासही मोठा फटका बसला. संत्रा व आंब्याची गळती झाली. काढणीवर आलेल्या गव्हाचे नुकसान झाले. चांदूरबाजार तालुक्यात काढणीवर आलेल्या कांदा पिकास हानी पोहोचली आहे. या दोन तालुक्यातील नुकसानीचे क्षेत्र मोठे आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा अंदाज घेण्यास व पंचनाम्याचे आदेश काढले असले तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती कक्ष बंद होता.

वाशीम : मालेगाव शहरात पाऊस तर किन्हीराजा, सोनाळा परिसरात गारपीट झाली. काही ठिकाणी झाडे पडली. या पावसाने भाजीपाला हळदी व फळबागांचे नुकसान झाले. सुमारे वीस मिनिट गारा पडल्या. वादळी वाऱ्यासह विजेच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने व गारांमुळें भाजीपाला पीक रब्बी ज्वारी फळबाग यांचे नुकसान झाले आहे. सोनाळा परिसरात लिंबाच्या आकाराच्या गारा पडल्याने या परिसरातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. रिसोड तालुक्यात अनेक भागात झाडे उन्मळून पडली. तुफान गारपीट झाल्यामुळे रस्त्यांवर गारांचा ढीग साचला. मंगरूळपीर तालुक्यातील सायखेडा येथील गारांमुळे भुईमूग कांदा भाजीपाला, संत्रा या पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

यवतमाळ : शहरासह पुसद तसेच इतर तालुक्यात पावसाने जनजीवन काही काळ विस्कळीत झाले होते. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. मंगळवारी दिवसभर उन्ह तापले. आर्णी, दारव्हा, दिग्रस तालुक्यात सायंकाळी सातच्या सुमारास पावसाने पुन्हा हजेरी लावली.

खामगावः खामगाव तालुक्यात आणि परिसरामध्ये नवीन वर्षाच्या प्रारंभीच दुपारी तीन वाजेदरम्यान सोसायट्याच्या वाऱ्यासह जोरदार गारपीट झाली. खामगाव तालुक्यातील लोखंडा येथील एका बालवाडीचे पत्रे उडाले. तालुक्यातील वरणा, अंत्रज, लोखंडा, गणेशपूर, चिंचपूर, लाखनवाडा प्रचंड नुकसान झाले.

वर्धा : वर्धेसह समुद्रपूर, हिंगणघाट तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. त्याचा फटका भाजीपाला वर्गीय पिकांसह फळपिकांनाही बसला. पावसासह असलेल्या वाऱ्यानेही मोठे नुकसान केले. बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणलेला शेतमालही ओला झाला. शेतात असलेले टरबूज फुटले तर तीळाचे पीक जमीनदोस्त झाले.

रब्बीतली तिसरी अवकाळी

फेब्रुवारी व मार्चमध्ये झालेल्‍या गारपिटीच्या ‍या नुकसानीतून शेतकरी अजून बाहेर निघालेला नाही. त्यातच नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्‍या या गारपिटीमुळे पुन्‍हा शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. यंदा रब्‍बी हंगामात विदर्भाला तिसऱ्यांदा अवकाळीचा फटका बसला आहे.

झाडे पडली, वीज पुरवठा खंडित

अकोला, यवतमाळमध्ये पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला. वाशीममध्ये रस्त्यांवर गारांचा खच साचला होता तर गावागावात झाडे पडली होती त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली.

वीज पडून नऊ मेंढ्या ठार

अकोला: तिला तालुक्यातील माळेगाव बाजार येथे निंबाच्या झाडावर वीज पडून नऊ मेंढ्या ठार झाल्याची घटना घडली. यामुळे संबंधितांचे मोठे नुकसान झाले. अकोला अकोट तेल्हारा व बाळापूर तालुक्यात पालेभाज्या व फळवर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर काही भागात वृक्ष कोलमडल्याने वाहतूकही विस्कळीत झाली होती. मागील वर्षी ९ एप्रिल २०२३ प्रमाणे आजही ९ एप्रिल २०२४ रोजी परत अकोला जिल्ह्यात एकदा गारपीट व अवकाळी पावसाचे थैमान झाले. तत्काळ शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com