
नागपूर : मंगळवारी (ता. ८ जुलै) सलग दुसऱ्या दिवशीही विदर्भात सर्वदूर संततधार पाऊस झाला. सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये दिवसभर पाऊस कमीअधिक प्रमाणात सुरू होता. मात्र, नागपूर विभागातील गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले. या तीनही जिल्ह्यांमध्ये नदीनाल्यांना पूर आल्याने अनेक रस्ते बंद झाले होते. अतिवृष्टीमुळे तीन जणांचा मृत्यू झाला, तर नागपूर विभागात १२ घरांचे नुकसान झाले.