...तर नागपूरचा होणार कोकण! 'या' आहेत धोकादायक वस्त्या

...तर नागपूरचा होणार कोकण! 'या' आहेत धोकादायक वस्त्या

नागपूर : कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात (konkan western maharashtra rain) आलेल्या पुरामुळे शेकडो नागरिकांचा मृत्यू झाला तर मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली. मुसळधार पावसाने दाणादाण उडाली. उपराजधानी नागपुरातील (nagpur) कुचकामी जलनिस्सारण व्यवस्था, सिमेंट रस्त्यांमुळे पाण्याचा निचरा होणे जवळपास थांबले आहे. दोन-चार तास जरी मुसळधार पाऊस कोसळला तर शहराचा कोकण होण्यास वेळ लागणार नाही. ८५ झोपडपट्ट्या (slum area) आणि खोलगट भागात असलेल्या ४० वस्त्‍यांमध्ये पाणी घुसण्याचा धोका आहे. (water will accumulate in 85 slum and 40 area of nagpur)

...तर नागपूरचा होणार कोकण! 'या' आहेत धोकादायक वस्त्या
भाजपच्या माजी आमदाराला काँग्रेसचा हात?

संपूर्ण शहरात मोठे तसेच अंतर्गत वस्त्यांमध्ये सिमेंट रस्त्याचे जाळे विणण्यात आले. सिमेंट रस्त्यांच्या तुलनेत घरे अगदी खोलगट भागात गेल्याचे चित्र आहे. याशिवाय शहरात पाणी साचणारे ६६ ठिकाणे, पुराचे पाणी साचत असलेल्या ८५ झोपडपट्ट्या तसेच ४० वस्त्या आहेत. शहरातील मध्यवर्ती भागात जुन्याच जीर्ण सिवेज लाईन असून कायम तुंबलेल्या असते. त्यामुळे अनेक ठिकाणी बारा महिने पाणी रस्त्यांवर वाहत असते. अशी शहराची स्थिती असून तीन ते चार दिवस कोकण, सातारा, सांगली, कोल्हापूरसारखा पाऊस कोसळला तर शहरातील घरांत पाणी नव्हे तर पाण्यात घरे दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठ वर्षापूर्वी रात्री दोन तास झालेल्या पावसामुळे व्हेरायटी चौकात बोट चालवावी लागली होती तर तीन वर्षांपूर्वी अधिवेशनादरम्यान विधानभवन परिसरातही पाणी शिरले होते. या दोन घटनांतूनही महापालिकेने अद्याप बोध घेतला नसल्याचे दिसून येत आहे. २०१५ मध्ये शहरासाठी ३४ हजार ६०४ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला होता. यात मलवाहिनीचे नवे जाळे, पावसाळी पाण्यासाठी स्टॉर्म वॉटर ड्रेनेज लाइनचे जाळे टाकणे प्रस्तावित होते. याशिवाय खोलगट भागातील झोपडपट्ट्यांत पाणी शिरू नये, याबाबतही उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या होत्या. परंतु त्यानंतर हा विकास आराखडा थंड बस्त्यात गेला. आज तो प्रकल्प विभागात रद्दीत पडला असल्याचे सूत्राने नमुद केले. त्यानंतर २०२० पर्यंत शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन महापौर नंदा जिचकार यांनी समिती गठित केली होती. शहरासाठी आराखडे तयार करून त्यावर अंमलबजावणीच केली जात नसल्याने शहर मोठ्या संकटात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

येथे साचते पाणी

  • झाशी रानी चौक, मानेवाडा रिंग रोड, साई मंदिर वर्धा रोड, नरेंद्रनगर पूल, मनीषनगर येथील रिलायन्स फ्रेश, रामेश्वरी रिंग रोड, शांतीनगर सिंधी कॉलनी, भऱतवाडा, जागनाथ बुधवारीसह ६६ ठिकाणे.

  • पुराचा धोका असलेल्या झोपडपट्ट्या ः वसंतराव नाईक झोपडपट्टी, कुंभारटोली, सावित्रीबाई फुलेनगर, तकीया, टीव्ही टॉवर, मानकापूर, पिवळी नदी, हत्तीनालासह ८५ झोपडपट्ट्या.

  • पाणी साचणाऱ्या वस्त्या ः रामदासपेठ, काछीपुरा, हजारीपहाड, बोरगाव, तुळशीबाग, भुतेश्वरनगर, पडोळेनगर, हिवरीनगर, चांभारनाला, गरीबनवाजनगर, झिंगाबाई टाकळीसह ४० वस्त्या.

मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर नाले ओव्हर फ्लो होतात. त्यामुळे शहराचे पाणी बाहेर जात नाही. परंतु, नाल्यातील पाणी वाहून गेले की शहरातील पाणीही वाहून जाते. एवढी काही वाईट स्थिती नाही. ३४ हजार कोटींचा विकास आराखडा ही दीर्घ प्रक्रिया असून टप्प्या-टप्प्याने कामे होत आहेत.
- अविनाश ठाकरे, सत्तापक्ष नेते, मनपा.
२००१ मध्ये शहर विकासाचा आराखडा तयार झाला. गेल्या २० वर्षांपैकी १५ वर्षे भाजप सत्तेत असून या विकास आराखड्याची किती अंमलबजावणी झाली, याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी दिले पाहिजे.
- प्रफुल्ल गुडधे पाटील, ज्येष्ठ नगरसेवक, कॉंग्रेस.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com