नागपूर : उन्हाच्या लाटेने रौद्ररूप धारण केले असून, नागपूरसह संपूर्ण विदर्भ अक्षरशः होरपळून निघतो आहे. बुधवारी नागपूरच्या पाऱ्याने यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच ४२ अंशांपर्यंत उचांकी झेप घेतली आहे. त्याचवेळी चंद्रपूरची सलग दुसऱ्या दिवशी देशातील सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद करण्यात आली.प्रादेशिक हवामान विभागाने पाच दिवस विदर्भात येलो अलर्ट दिलेला आहे. त्याचा प्रभाव आज विदर्भात सगळीकडेच तीव्रतेने जाणवला. नागपूरच्या कमाल तापमानात आज आणखी अर्ध्या अंशाची वाढ होऊन पारा ४२.१ अंशांवर गेला.
या मोसमातील हे उचांकी तापमान ठरले. उन्हाचा सर्वाधिक तडाखा पूर्व विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्याला बसतो आहे. येथे लागोपाठ दुसऱ्या दिवशी राज्यासह संपूर्ण देशात सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. येथे नोंद झालेले ४४.२ अंश सेल्सिअस तापमान जगात चौथ्या क्रमांकावर राहिले. तशी नोंद अल डोराडो या जागतिक हवामान केंद्राच्या संकेतस्थळावर करण्यात आली.
विदर्भातील वर्धा (४२.८अंश सेल्सिअस), वाशीम (४२.५ अंश सेल्सिअस) व यवतमाळ (४२.० अंश सेल्सिअस) सह अन्य जिल्ह्यांमध्येही उन्हाचे जोरदार चटके जाणवले. अंगाची लाहीलाही होणारे असह्य ऊन व उकाड्यामुळे विदर्भवासी सध्या कमालीचे त्रस्त आहेत. सूर्यास्तानंतरही उन्हाच्या झळा बसताहेत. हवामान विभागाने येलो अलर्ट लक्षात घेता किमान तीन-चार दिवस तरी उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. राजस्थानमधून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे सध्या मध्य भारतासह विदर्भातही उन्हाची तीव्र लाट पसरली आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.