Farmer Suicide : आता कुणाच्या बाबांचे सरण रचले जाऊ नये!

आत्महत्या केलेल्या शेतकरी कन्येचे मुख्यमंत्र्यांना आर्जव
Yavatmal heavy rain crop damage farmer committed suicide
Yavatmal heavy rain crop damage farmer committed suicide

यवतमाळ : नाल्याच्या पुरामुळे दोन वेळा शेत खरडून गेल्याने माझ्या बाबांनी आत्महत्या केली. आत्महत्या केल्याने प्रश्‍न सुटत नाही. आमचे कुटुंब उघड्यावर आले. इतर शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून सरकारने काही तरी ठोस उपाय करायला हवेत, अशी विनंती दहावीत शिकणाऱ्या वैष्णवीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली. अश्रू आवरत वैष्णवी म्हणाली, ’आता कुणाच्या बाबांचे सरण रचले जाऊ नये!’

मारेगाव तालुक्यात २५ ते ३० ऑगस्टदरम्यान सहा दिवसांत सात तरुण शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यातील काही शेतकरी, तर काही शेतकरीपुत्र आहेत. बोरी (गदाजी) येथील पुंडलिक मारोती रुयारकर या ४३ वर्षांच्या शेतकरीपुत्राने एक सप्टेंबर २०२२ रोजी स्वतः:च्या शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यांच्याकडे वडिलांचे नावे असलेली साडेतीन एकर शेतजमीन आहे. त्यावर ३६ हजारांचे कर्ज आहे. खासगी कर्ज वेगळे. यंदा दोन वेळा पुरामुळे शेतजमीन खरडून गेली. पहिल्यांदा खरडून गेली तेव्हा पुन्हा हिमतीने पेरली. कपाशी, तुरीची लागवड केली. परंतु, दुसऱ्यांदाही पीक वाहून गेले.

पुंडलिक मनाने पार खचला. पै पै ला मोताज झालेला पुंडलिक एक सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजता घरून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात त्याचा मृतदेहच आढळला. ही वार्ता गावात पसरताच संपूर्ण गाव हळहळले. पुंडलिकच्या आत्महत्येने म्हातारे वडील मारूती रूयाकर, आई बेबी व पत्नी वंदना, मुली वैष्णवी व भाग्यश्री आणि मुलगा जय उघड्यावर आले. या परिवाराचे दु:ख समजून घेण्यासाठी शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी शुक्रवारी (ता. दोन) त्यांच्या घरी भेट दिली.

तेव्हा दहावीत शिकणाऱ्या वैष्णवीने डोळ्यांत अश्रू आणत थेट मुख्यमंत्र्यांनाच विनंती केली. दोनदा शेत खरडून गेले तरी साधा अधिकारी आला नाही, आमदारही आले नाही. कोणीही धीर दिला नाही. अखेर माझे बाबा सरणावर गेले. यानंतर कुणाच्याही बाबांना सरणावर जाण्याची वेळ येऊ नये, म्हणून सरकारने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्यावे.

बोरी (गदाजी) येथील १५० एकर जमीन पुराच्या पाण्याने वाहून गेली. दोन वेळा खरडून गेली. पिके वाहून गेलीत. नुकसान किती झाले हे बघण्यासाठी ना आमदार आले ना अधिकारी. कृषिमंत्र्यांनी तर साधे डोकावूनही बघितले नाही. प्रोत्साहन निधीचे ५० हजार अजूनही भेटले नाही. त्यामुळे शेतकरी प्रचंड अस्वस्थ झाले आहेत.

-प्रवीण नान्ने, सरपंच बोरी (गदाजी) ता. मारेगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com