शहरात कुणीही बेघर राहणार नाही

छायाचित्र
छायाचित्र

नागपूर ः पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आज चार हजार 345 लोकांना घरे मिळणार आहेत. मात्र, उर्वरित नागरिकांना चिंता करण्याचे कारण नाही. दुसऱ्या टप्प्यात घरकुलाचे काम सुरू करण्यात येईल. नागपुरात कुणीही बेघर राहणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज दिली.
नागपूर महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (एनएमआरडीए) व नासुप्रच्या वतीने अंबाझरी मार्गावरील नैवेद्यम सभागृहात आज पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी लॉटरी पद्धतीने केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार विकास कुंभारे, आमदार डॉ. मिलिंद माने, नासुप्र विश्‍वस्त भूषण शिंगणे, नासुप्र सभापती शीतल उगले, एनएमआरडीचे सदस्य, एनएमआरडीएचे हेमंतकुमार पवार आदी उपस्थित होते. चार हजार 345 घरांची कामे पूर्ण झाली असून तीन महिन्यांत लाभार्थ्यांना ताबा मिळेल, असे नमूद करीत गडकरी म्हणाले, या घरकुलांसाठी नागरिकांना दहा हजार रुपये शुल्क भरावे लागत होते. मात्र, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व इतर काही लोकांनी गरीब लोकांना दहा हजार देणे शक्‍य नसल्याचे सांगून शुल्क कमी करण्याची मुख्यमंत्री व माझ्याकडे मागणी केली. त्यामुळे हे शुल्क एक हजार रुपये करीत नागरिकांना दिलासा दिला. साडेसात हजार अर्जदारांपैकी चार हजार 345 लोकांना घरकुल मिळणार आहेत. मात्र, शिल्लक नागरिकांना चिंतेचे कारण नाही. या घरांचे वाटप झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील घरांसाठी सुरुवात करणार आहे. प्रत्येक गरीब माणसाला त्याच्या मालकीचे घर मिळवून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक नासुप्र सभापती शीतल उगले यांनी केले.
लाभार्थ्यांची रस्त्यांवर गर्दी, गडकरींची माफी
आपले घर व्हावे, या अपेक्षेने हजारो नागरिक सभागृहाबाहेर उभे आहेत. सभागृह लहान असल्याने ते आतमध्ये येऊ शकले नाही, त्यांना रस्त्यावर उभे राहावे लागल्याबाबत गडकरींनी भाषणातून माफी मागितली. पुढील सोडतीचा कार्यक्रम सुरेश भट सभागृहात घेऊ, असेही ते म्हणाले.
नागरिकांना एसएमएसद्वारे माहिती
यावेळी ऑनलाइन पद्धतीने लाभार्थ्यांसाठी सोडत काढण्यात आली. चार हजार 345 लाभार्थी असल्याने प्रत्येकाचे नाव घेणे शक्‍य नसल्याने प्रत्येक लाभार्थ्यांना त्यांच्या नावाची सोडत निघताच एसएमएसद्वारे माहिती देण्यात येत असल्याचे नासुप्र सभापती शीतल उगले यांनी स्पष्ट केले.
वीटभट्ट्यांची जागा ताब्यात घेण्याचे निर्देश
कामठी मार्गावरील वीटभट्ट्यांची जागा नासुप्रची असून ताब्यात घेण्यासाठी वारंवार सूचना केल्याचे नमूद करीत गडकरींनी अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले. ही जागा ताब्यात घेऊन येथेही घरकुल योजना राबविण्याची सूचना त्यांनी केली. येथील नागरिकांना कोराडी येथे जागा देण्यात आल्याचेही ते म्हणाले.

..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com