
अकोला : खरीप महिनाभरावर येऊन ठेपला असून, शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा वेळेत होणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने कृषी विभागाद्वारे कृषी सेवा केंद्र, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी यांचा समन्वय साधून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावरच मागणीनुसार कृषी निविष्ठांचा पुरवठा करण्याचे निर्देश कृषी आयुक्तांनी, राज्याचे सर्व विभागीय कृषी सहसंचालक तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना दिले आहेत.
राज्यातील खरीप नियोजनाबाबत सर्व जिल्ह्यांच्या आढावा बैठका 20, 21 व 22 एप्रिल रोजी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आल्या. खरीप हंगाम लवकर सुरू होत असल्याने शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांचा पुरवठा सुद्धा वेळेत होणे आवश्यक आहे. परंतु, राज्यामध्ये कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यांमध्ये सध्या संचारबंदी जाहीर करण्यात आली असून, अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कृषी सेवा केंद्रांवर येऊन कृषी निविष्ठा खरेदी केल्यास जास्त गर्दी होऊ शकते आणि सोशल डिस्टंन्सींग न पाळले गेल्यास कोरोना विषाणुचा फैलाव मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. यासाठी ज्याप्रमाणे शेतकरी गटांमार्फत भाजीपाल्याचा पुरवठा शहरांमध्ये कृषी विभागाच्या समन्वयाने करण्यात आला, त्याच धर्तीवर कृषी सेवा केंद्र आणि शेतकरी गट/शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचा पुरवठा शेतावर करण्याचे आढावा बैठकींमध्ये नियोजन आखण्यात आले. त्यानुसार लवकरात लवकर कार्यवाही करण्याच्या सूचना सुद्धा कृषी आयुक्तांनी कृषी सहसंचालक व जिल्हा कृषी अधीक्षकांना सोमवारी (ता.२७) दिल्या आहेत.
असा होईल कृषी निविष्ठांचा पुरवठा
शेतकऱ्यांनी त्यांच्या भागातील सोयीच्या आत्मा अंतर्गत गटकडे नोंदणी करावी. शेतकऱ्यांनी त्यांचे नाव, पत्ता, सर्वे नंबर/गट नंबर, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, ज्या कृषी सेवा केंद्रामधून निविष्ठा खरेदी करायच्या आहेत त्यांचे नाव व कृषी निविष्ठांची मागणी गटाकडे करावी. निविष्ठांची नोंदणी गटांकडे झाल्यानंतर गटप्रमुखच बियाणे, खते, कीटकनाशकांची खरेदी करतील. ज्या विक्रेत्यांना शक्य असेल ते मोबाईल ॲप तयार करून शेतकऱ्यांची मागणी नोंदवून घेतील व मोठी मागणी असल्यास कृषी निविष्ठा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहचवतील. कृषी सेवा केंद्र ते शेतकरी गट या वाहतुकीकरिता कृषी विभागाचे अधिकारी परवाने कृषी विभागामार्फत गटांकरिता उपलब्ध करून देतील. मात्र आर्थिक बाबी शेतकरी गटामार्फत हाताळण्यात येतील. तालुका स्तरावर यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यात येणार असून, 31 मे पूर्वी किंवा हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.