यवतमाळ : लॉकडाउनमुळे अडकलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्यांच्या परतीचा मार्ग मोकळा केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडकलेले नागरिक, विद्यार्थी, मजूर आदी स्वगृही परत येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही 20 हजार 800 नागरिकांची एंट्री झाली आहे. आरोग्य तपासणी करून गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक करण्यात आले आहे.
लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याला सुरवात होताच पालकमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी इतर राज्यांचे सचिव, संबंधित जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधला. प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर अडकलेले नागरिक आता स्वगृही येत आहे. जिल्ह्यात परत येणाऱ्यांची तालुकास्तरीय समितीमार्फत वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना 14 दिवस गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक आहे.
यानुसार यवतमाळ जिल्ह्यात बाहेरच्या राज्यातून तीन हजार 818 नागरिक तर महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातून 16 हजार 982 असे एकूण 20 हजार 800 नागरिक स्वगृही आले आहेत. संबंधित तालुक्याच्या ठिकाणी तालुकास्तरीय समितीच्या माध्यमातून त्यांची आरोग्य विषयक तपासणी होत आहे. यात ताप, सर्दी, खोकला व इतर बाबींची तपासणी केली जाते.
आतापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून 39 बसेसद्वारे जिल्ह्यात अडकून पडलेले 749 मजूर इतर जिल्ह्यात पाठविण्यात आले आहे. 27 बसेसने इतर जिल्ह्यातून 539 मजूर यवतमाळात दाखल झाले आहे. सोबतच जिल्ह्यातील 1, 805 मजूरांना रेल्वेने त्यांच्या राज्यात पाठविले आहे. अमरावती आणि अकोला येथून हे मजूर रेल्वेने त्या-त्या राज्यात परत गेले. यात उत्तर प्रदेश 467, बिहार 360, झारखंड 780, मध्य प्रदेश 372, हिमाचल प्रदेश23, जम्मू आणि काश्मिर 17, पंजाब सात याप्रमाणे मजुरांचा समावेश आहे. त्याचा संपूर्ण खर्च जिल्हा प्रशासनाद्वारे करण्यात आला.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.