हॉटेल, भोजनालयातून कांदा गायब 

file photo
file photo

वर्धा : फोडणी चवदार होण्यासाठी आणि जेवणासोबत कांद्याची गोडी चाखण्यासाठी सर्वांनाच कांद्याने भुरळ घातलेली आहे. त्यामुळे भोजनासोबत कांदा हे समीकरणच झाले आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून बाजारातील कांद्याची आवक मंदावल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम शहरातील हॉटेल, भोजनालय, खाणावळीतून कांदा हद्दपार झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. 

सर्वसामान्यांपासून श्रीमंतांपर्यत सर्वांच्याच स्वयंपाकघरात लसूण आणि कांद्याशिवाय फोडणीला चव येत नाही. याशिवाय अनेकजण जेवण अधिक चवदार व्हावे, यासाठी कांदा खाण्यास पसंती देतात. त्यामुळे कांदा हा बारा महिने सर्वांनाच खाण्याकरिता हवाहवासा वाटतो. परंतु, कांद्याची मागणी कायम असताना आवक कमी झाल्याने दर सगळीकडेच गगनाला भिडले आहेत.

त्यामुळे कांद्याची खरेदी करणे सर्वसामान्य माणसांच्या आवाक्‍याबाहेर झाले आहे. सध्या वर्धा शहरात नवीन कांदा काही प्रमाणात दाखल झाला असला तरी तो परजिल्ह्यातून येत आहे. तर स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा अद्याप काढणीला आलेला नसल्याने बाजारात कांद्याची कमतरता आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. 

बाजारात 60 ते 70 रुपये किलोवर भाव

सध्या शहरातील बाजारात 60 ते 70 रुपये किलोवर भाव पोहोचले आहेत. एरवी 10 ते 15 रुपये किलोप्रमाणे मिळणारा कांदा आता महाग झाल्यामुळे गृहिणींकडून खरेदी करताना त्यात काटकसर करण्यात येत असल्याचे पाहावयास मिळते. 
यावर्षी झालेल्या परतीच्या पावसाचा कांद्याला मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने उत्पादनातही घट झाली आहे. नाशिक, अहमदनगर, लासलगाव येथील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा आता विक्रीसाठी काढला आहे. तर शेतकरी मात्र, काढणी केल्यानंतर यापूर्वीच कमी दरामध्ये कांद्याची विक्री करून मोकळा झाला आहे. त्यामुळे कांद्याचे दर वाढले असले तरी त्याचा फायदा मात्र, व्यापारी व विक्रेत्यांच्याच घशात जात आहे. असे असले तरी सर्वसामान्य ग्राहकांना मात्र, जादा पैसे देऊन कांद्याची खरेदी करावी लागत आहे. 

जेवणासोबत कांदा देणे टाळले

शहरातील हॉटेल, भोजनालयात ग्राहकांना जेवणासोबत कांदा देणे जवळपास टाळले जात आहे. एरवी न मागता कांदा देणारे हॉटेलमालक आता मात्र, ग्राहकांनी मागणी केल्याशिवाय देत नाहीत. तर काही भोजनालयात तर कांदा नसल्याचे स्पष्ट सांगितले जात आहे. काही भागातील उत्पादक शेतकऱ्यांच्या नवीन कांद्याला चांगला भाव मिळत आहे. 
 
नाशिक, लासलगावातून आवक

सध्या स्थानिक शेतकऱ्यांचा नवीन कांदा अद्यापही बाजारात आला नसून, तो येण्यासाठी दोन महिन्यांचा तरी कालावधी लागणार आहे. त्यामुळे वर्धा बाजारात आजघडीला नाशिक, अहमदनगर, लासलगाव या बाजारपेठेतून कांद्याची आयात होत आहे. त्याचा परिणाम ग्राहकांना 50 ते 70 रुपये किलोप्रमाणे कांदा खरेदी करण्याची वेळ आली आहे. 

 
सध्या वर्धा येथील बाजारात नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून जुना व नवीन कांदा दाखल होत आहे. मात्र, स्थानिक शेतकऱ्यांचा कांदा अद्यापही आलेला नाही. जिल्ह्यातील कांदा उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात येतो. सध्या आवक कमी असल्यामुळे कांद्याचे दर वाढले आहेत. 
-मोरेश्‍वर कडू, कांदा व्यापारी, वर्धा.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com