कापसाच्या भाववाढीस वस्त्रोद्योग क्षेत्रातून विरोध

पाच दशकानंतर प्रथमच कापसाला सोनेरी भाव
Cotton
Cottonsakal

अमरावती : शेतकऱ्यांच्या जीवनात गेल्या दोन तीन दशकांत अनेक स्थित्यंतरे आणणाऱ्या पांढऱ्या सोन्याला अर्थात कापसाला यंदा प्रथमच दहा हजारी भाव मिळाला आहे. या भावाने शेतकरी खूष आहे. मात्र, कापसाच्या या वाढीव भावास जिनिंग-प्रेसिंगसह वस्त्रोद्योग क्षेत्रातून मात्र विरोध होऊ लागला आहे. वाढीव भाव कसे कमी होतील, यासाठी ही लॉबी सक्रिय झाली आहे, असे आरोप होऊ लागले आहेत.

कापूस यंदा (वर्ष २०२२) प्रथमच उच्चांकी म्हणजे १० हजाराच्या भावाने चमकू लागला आहे. गेल्या दीड -दोन महिन्यांपासून कापसाच्या बाजारात कापसाचे भाव १० हजाराच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. अनेक बाजार समित्यांमध्ये ९ ते ११ हजार पर्यंत भाव गेले आहेत. शेतकऱ्यांना चांगले भाव मिळू लागले असताना त्यावर थेट अवलंबून असलेल्या जिनिंग व वस्त्रोद्योगाच्या अर्थकारणाला फटका बसू लागला आहे. सध्या जिनिंग फॅक्टरींना वाढीव दराने कापूस खरेदी करावा लागत आहे. एक क्विंटल कापसातून ३५ ते ३६ किलो रूई व ६२ ते ६३ किलो सरकी निघणे अपेक्षित आहे. त्यामुळे रुई व सरकीचे प्रमाण ३५-६५ असले तरच कापसाला वाढीव दर देणे परवडू शकते. मात्र सध्याच्या कापसातून रुई व सरकीचा हवे ते प्रमाण मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. परिणामी या वर्षी गाठींसह सरकी व ढेपीचे भाव वाढले आहेत.

सध्या ढेप ३९ रुपये किलो आहे. सरकीचे भाव वाढल्याने तेलाचेही भाव वाढले आहेत. याशिवाय मजुरी, मशिनचा घसारा खर्च, विद्यूत, वाहतूक असे विविध खर्च लागू असल्याने कापड महागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कापसाचे सध्या उंचावलेले भाव कमी करण्यासाठी वस्त्रोद्योग लॉबी सक्रिय झाली असल्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. कापूस महागला तर धागा महागेल व परिणामी कपडा महाग होईल, अशी भीती दाखविण्यात येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

भाव असा ठरतो

जिनिंग-प्रेसिंगमधून तयार झालेल्या खंडीपासून (दोन गाठींची एक खंडी) किती लांबीचे सूत निघू शकते, यावर भाव ठरतात. यंदा २९ प्लस खंडीचे भाव ७६ ते ७७ हजार रुपये प्रती खंडी झाले आहेत. सूतगिरणीतून तयार होणारे सूत कपडा मिल काऊंटनुसार खरेदी करते. २० ते ३० काऊंट असल्यास ते सूत उत्तम मानल्या जाते. गतवर्षी या काऊंटचा दर १८० ते १९० प्रती किलो होता, तो यंदा २५० ते ३०० रुपये इतका झाला आहे. त्याचा एकूणच परिणाम कापड निर्मितीवर होतो.

कापसाचे भाव वाढले तर धाग्याचे व कापडाचे भाव वाढणारच आहेत. या वाढीव भावाचा वस्त्रोद्योग क्षेत्रालाही लाभ मिळतोच. त्यामुळे वस्त्रोद्योग क्षेत्रातून कापसाचा भाव वाढण्याला विरोध होत असल्याची चर्चा अनाठायी आहे.

- हरीश मोहोड, प्रबंध व्यवस्थापक, सूर्यालक्ष्मी टेक्स्टाईल्स इंडस्ट्रिज

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com