व्वा व्वा! वरुडची संत्री जाणार बांगलादेशाला

oranges.
oranges.

वरुड, (अमरावती) ः विदर्भातील कॅलिफोर्निया म्हणून ओळख असलेल्या परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आता सुगीचे दिवस येणार आहेत. नरखेड-अमरावती हा रेल्वेमार्ग संत्रा वाहतुकीसाठी खुला होणार असल्याने आता शेतकऱ्यांना थेट बांगलादेशापर्यंत संत्री नेता येणार आहेत. त्यामुळे देशभरातील मोठ्या बाजारपेठांशी शेतकरी प्रत्यक्ष जोडला जाणार असल्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता मिळणार असून संत्र्याची महती व गोडवा अधिक वाढणार आहे.

विदर्भाचा कॅलिफोर्निया, अशी बिरुदावली मिरविणाऱ्या मोर्शी, वरुड तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात संत्री पिकतात. इथल्या आंबटगोड मधुर चवीच्या संत्र्याला जगभरात मोठी मागणी आहे. मात्र शेतकऱ्यांनी पिकविलेली संत्री स्वतःच देशभरातील बाजारपेठांमध्ये नेऊन विकण्याची सोय नसल्याने आतापर्यंत स्थानिक व्यापाऱ्यांकडून संत्री विकत घेतली जात होती. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात शेतकऱ्यांची संत्री थेट नेता यावी, यासाठी जलद रेल्वेवाहतूक हा पर्याय उपलब्ध होणे गरजेचे होते. आता हा प्रश्‍न सुटण्याची आशा दिसू लागली आहे.

संत्र्याला जागतिक बाजारपेठ उपलब्ध असून त्याच्या वाहतुकीतील अडथळे दूर करून संत्रा वाहतुकीसाठी किसान रेल्वेचा पर्याय उपलब्ध करून देता येईल का? याची चाचपणी करण्यासाठी वरुड येथे संत्रा उत्पादक व रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाची चर्चा झाली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही याकरिता सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नुकत्याच नागपूर येथे विभागीय रेल्वे कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत वरुड ऑरेंजसिटी रेल्वेस्थानक ते बेनापोल (बांगलादेश) येथे संत्र्याच्या वाहतुकीस तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची खासदार डॉ. विकास महात्मे यांची प्रमुख उपस्थितीत टाटा कन्सलटंसी सर्व्हिसेसतर्फे राबविण्यात येत असलेल्या धान से चावल तक खासपान पट्टा कडधान्य प्रकल्प, संत्रा उत्पादन तंत्रज्ञान, पणन व प्रक्रिया प्रकल्पाचा आढावा एका वेबिनारद्वारे घेण्यात आला होता. त्यावेळी किसान रेल्वेद्वारे उत्पादित मालाची वाहतूक करण्याबाबत सूचित करण्यात आले होते. त्या अनुषंगाने ताज फ्रूट कंपनी वरुड येथे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राथमिक स्वरूपाचे सर्वेक्षण केले होते.

सविस्तर वाचा - निसर्गाच्या कुशीत वसलेले डोंगरांवरचे गाव

वरुड, चांदूरबाजार, अचलपूर आदी संत्रा उत्पादन भागातून ४५० ते ५०० टन संत्रा ट्रकद्वारे बांगलादेश येथे पाठविण्यात येत असतो. संत्रा वाहतूक रेल्वेच्या पार्सल व्हॅनद्वारे केल्यास ४ हजार ५३८ प्रति मे.टन वाहतूक खर्च येणार असून वेळेची बचत होणार आहे. त्यानुसार नुकतीच रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेशकुमार यांच्या अध्यक्षतेखाली व वरिष्ठ वाणिज्य सरव्यवस्थापक कृष्णा पाटील, सहायक विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनुप साथपट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत संत्रा उत्पादकांची विभागीय रेल्वे कार्यालय नागपूर येथे बैठक पार पडली.

संपादन - स्वाती हुद्दार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com