भामरागड: पालेभाज्यांची देखभाल करताना पुलनार येथील ग्रामस्थ.
भामरागड: पालेभाज्यांची देखभाल करताना पुलनार येथील ग्रामस्थ.

पुलनारवासींनी सामूहिक प्रयत्नातून फुलविली परसबाग, लॉकडाउनच्या काळात भाजीपाला तुटवड्यावर शोधला उपाय 

Published on

भामरागड  : लॉकडाउनमुळे दुर्गम भागात गेली अनेक दिवस नागरिकांना भाजीपाला मिळाला 
नाही. ही समस्या ग्रामीण भागातच नाही तर तालुक मुख्यालयातही जाणवली. त्यामुळे नक्षलग्रस्त पुलनार येथील ग्रामस्थांनी एकत्र येऊन गावात परसबाग फुलवून या समस्येवर तोडगा काढला. आता तेथील ग्रामस्थांचीच अडचण दूर झाली नाही तर आजूबाजूच्या गावांतील लोक तेथे भाजी खरेदीसाठी येत आहेत. 

भामरागड तालुक्‍यातील बहुतांश गावे दुर्गम आहेत. रस्ते, पूल आणि आरोग्य समस्येचा तेथील नागरिकांना नेहमीच सामना करावा लागतो. यंदा तर कोरानोच्या समस्येमुळे जीवनावश्‍यक वस्तू तसेच भाजीपाला खरेदीसाठी तालुका मुख्यालयात पायपीट करावी लागली. दुर्गम गावातील लोक विशेषतः आठवडी बाजारात अत्यावश्‍यक वस्तू खरेदी करीत असतात.

परंतु, यंदा कोरोनाच्या समस्येमुळे जिल्हा प्रशासनाने गावागावांत भरणाऱ्या आठवडी बाजारावर बंदी घातली. त्यातच लॉकडाउनमुळे भाजीपाला वाहतूक करणारी वाहने गावापर्यंत पोचत नव्हती. त्यामुळे गेली अनेक दिवस कडधान्यावरच आपला गुजारा करावा लागला. 
मात्र, या अडचणीवर अति दुर्गम पुलनार येथील ग्रामस्थांनी उपाय शोधला. गावात सामूहिक प्रयत्नातून 
परसबाग तयार केली.

जैविक खताचा वापर करून त्याची देखभाल करून विविध प्रकारच्या पालेभाज्या घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे येथील नागरिकांचा पालेभाज्यांची अडचण दूर झाली. एवढेच नव्हे तर गावालगतच्या गुंडूरवाही, मारकणार, कोहपरर्शी या गावांसह परिसरातील ग्रामस्थ पुलनार येथे भाजी खरेदीसाठी येत आहेत. 

ग्रामस्थांच्या प्रयत्नातून तयार केलेल्या परसबाग आता तेथील नागरिकांसाठी उत्पन्नाचे साधन बनले असून इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. भामरागड शहराला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पावसाळ्याच्या दिवसात पूर येत असल्याने नेहमीच आठ-आठ दिवस बाजारपेठ बंद असते. त्यामुळे नागरिकांना भाजीपाल्यांची समस्या भेडसावते. अशा परिस्थीतीत पुलनार येथील ग्रामस्थांना गावात फुलविलेल्या परसबागेची मदत होणार आहे. 

नवीन पुलाची प्रतीक्षा....... 
भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीवर असलेल्या ठेंणग्या पुलामुळे दरवर्षी येथे पूरपरिस्थितीची समस्या उद्‌भवते. याचा फटका तालुक्‍यातील शेकडो गावांना बसतो. गेल्या वर्षी तब्बल आठ वेळा भामरागड शहरात पुराचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. ही समस्या गेल्या अनेक वर्षांपासून आहे. मात्र, नवीन पुलाचे बांधकाम प्रतीक्षेत आहे. शासनाने पर्लकोटा नदीच्या पुलासाठी निधीसुद्धा मंजूर केला होता. परंतु, लोक प्रतिनिधी तसेच प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे समस्या कायम आहे. तालुक्‍यात 
पुरामुळे संपर्क तुटणारी 120 गावे आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com