
चंद्रपूर ः परंपरागत शेतीला बायबाय करीत बळीराजा शेतात नवे प्रयोग करीत आहे. नगदी पीक घेण्याकडे बळीराजाचा कल आहे. सोयाबीन ,कपाशी या पिकासोबतच आता जिल्ह्यातील शेतशिवारात हळदीचे पीक बहरत आहे. जिल्ह्यात यंदा पहिल्यांदाच जवळपास शंभर हेक्टर क्षेत्रात १७४ शेतकऱ्यांनी हळद पिकाची लागवड केली आहे. अल्पावधीतच हातात येणारे नगदी पीक असलेल्या हळदीची प्रथमच मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात लागवड झाली आहे. यातून जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे.
जिल्ह्यात धान, कापूस, सोयाबीन आणि तूर ही पिके प्रामुख्याने घेतली जातात. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे दरवर्षीच शेती तोट्यात जात असल्याने बळीराजा चिंतेत आहे. गेल्या काही वर्षांपासून कृषी विभागाकडून पिकात फेरबदल करण्याचा सल्ला दिला जात आहे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनात अनेक शेतकऱ्यांनी शेतीत नवेनवे प्रयोग सुरू केले आहेत. त्यात अनेकजण यशस्वी झाले आहेत. आता तर जिल्ह्यात पहिल्यांदाच शंभर हेक्टर क्षेत्रात हळदीचे पीक फुलले आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हा वार्षिक योजना, नावीन्यपुर्ण योजनेतून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे हळद बियाणेसाठी अनुदानाची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाने निधी मंजूर केला. जवळपास एक कोटी रुपयांचा निधी हळद बियाणेसाठी मंजूर केला. त्यानंतर कृषी विभागाने शेतकऱ्यांकडून हळद बियाणांसाठी अर्ज मागविले. त्यानंतर १७४ शेतकऱ्यांनी अर्ज केले. त्या शेतकऱ्यांना ७५ लाखांचे अनुदान हळद बियाण्यांसाठी देण्यात आले. बियाणे खरेदीनंतर अनेक शेतकऱ्यांनी यंदा पहिल्यांदाच शेतात कृषी विभागाच्या मार्गदर्शनाच हळदीची लागवड केली आहे. पूर्वी वरोरा, भद्रावती तालुक्यात थोडेबहुत शेतकरी हळदीचे पीक घ्यायचे. यंदा वरोरा, भद्रावती, चिमूर, कोरपना आणि मूल तालुक्यातील तब्बल १७४ शेतकऱ्यांनी हळदीची लागवड केली आहे. जवळपास १०० हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड करण्यात आली आहे. हळदीच्या पिकाला मजुरीचा खर्च इतर पिकापेक्षा अधिक येतो. त्यामानाने उत्पन्न मोठे असते. हळदीला बाजारात चांगला भाव मिळतो. सध्या बाजारात नऊ ते अकरा हजार रुपये प्रति क्विंटल भाव आहे. हळदीचे पीक आल्यावर चांगला भाव हळद उत्पादकांना मिळणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून कृषी विभाग पिकांच्या फेरपालटबाबत शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करीत आहेत. त्याचा हा परिणाम आहे. पूर्वी जिल्ह्यात हळद मोजकेच शेतकरी घेत आहे. यंदा १७४ शेतकऱ्यांनी लागवड केली. त्यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून अनुदान देण्यात आले. हळदीचे क्षेत्रही वाढले आहे. शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न हाती येईल.
शंकर किरवे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर.
-संपादन ः चंद्रशेखर महाजन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.