file photo
file photo

सदोष बियाण्यांच्या तक्रारींचा पाऊस; आठ हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत

यवतमाळ : जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणविषयी तक्रारीचा अक्षरक्ष: पाऊस पडला आहे. जिल्हाभरातून तब्बल दहा हजार तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. यातील जवळपास दीड हजार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली असली तरी, अजूनही आठ हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. 

खरीप हंगामाकडून यंदा शेतकऱ्यांचा अपेक्षा होत्या. पाऊस तसेच रब्बी हंगामाचा अंदाज घेत यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली. सुरुवातीला पाऊस चांगला असल्याने पेरणी मोठ्या प्रमाणात झाली. मात्र, त्यानंतर पावसाने ब्रेक घेतला. या कालावधीत पेरलेले सोयाबीन बियाणे उगविले नसल्याचे समोर आले. अनेक भागात सदोष बियाण्यांचा पुरवठा झाला. त्यामुळे उगवणशक्ती प्रभावित झाली. बियाण्यासंदर्भात जिल्ह्यात दहा हजारांवर तक्रारी दाखल झाल्या आहे. अमरावती विभागात सर्वाधिक तक्रारी या जिल्ह्यात झाल्या आहेत. यंदा कापसाखालील लागवड क्षेत्रात काही प्रमाणात घट झाली आहे. कापसापेक्षा शेतकऱ्यांनी सोयाबीनला पसंती दिली होती. मात्र, यावर्षी बियाणेच सदोष निघाल्याने शेतकऱ्यांना नव्या संकटांना तोंड द्यावे लागले. कृषी विभागाला प्राप्त झालेल्या जवळपास अकरा हजार तक्रारींपैकी दहा हजार तक्रारी सदोष सोयाबीन बियाण्यासंदर्भात आहेत. यातील 260 शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे नुकसान भरपाई म्हणून परत करण्यात आले. त्यानंतर पेरणीचा हंगाम गेल्याने आता शेतकऱ्यांना रक्कम परत केली जात आहे. आतापर्यंत 40 लाखावर रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास दीड हजार शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. मात्र, अजूनही आठ हजारांवर शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. मोठ्या प्रमाणात सदोष बियाण्यांच्या तक्रारी असतानाही कारवाईला विलंब होत आहे. सोयाबीनचा अर्धा हंगाम जवळपास संपला आहे. असे असताना अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तर मिळणार नाही, किमान सीड्‌स कॉस्टची रक्कम तरी लवकर मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकऱ्यांना डबल भुर्दंड
अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे उगविले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच बियाणे न मिळाल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यासाठी मशागत केली. त्याचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसला. असे असतानाच सोयाबीन बियाण्यांची रक्कम मिळत नसल्याने शेतकऱ्यांना अधिकचा ताप सहन करावा लागत आहे.

-संपादन ः चंद्रशेखर महाजन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com