रिपब्लिकन पक्ष उभारण्याचा संकल्प बाबासाहेबांचाच

File photo
File photo

नागपूर : सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी एखादा ताकदीचा विरोधी राजकीय पक्ष असावा, या हेतूने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी "रिपब्लिकन पक्ष' उभारण्याचा संकल्प केला होता. तशी बड्या विचारवंतांशी बोलणीही सुरू केली होती, परंतु त्यांचे महापरिनिर्वाण झाले. मात्र, खुल्या पत्रावर "रिपब्लिकन' विचारधारा त्यांनी दिली. या विचारधारेतून 3 ऑक्‍टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पक्ष आकाराला आला. परंतु, दीक्षाभूमीवर स्वयंघोषित रिपब्लिकन नेत्यांना बाबासाहेबांच्या भूमिकेचा विसर पडला. या पक्षाच्या गटाच्या संख्येने अर्धशतक गाठले. पन्नास गटाधिपती तयार झाले असले तरी रिपब्लिकन विचारधारा अजरामर राहणार आहे.
पाच दशकांपूर्वी रिपब्लिकनांची शक्ती नजर लागेल अशीच होती. त्या काळात जनसंघ, कॉंग्रेस आणि नागविदर्भ चळवळीसमार रिपब्लिकन पक्ष म्हणजे "गजराज' होता. जनहित जोपासणाऱ्या रिपब्लिकन पक्षाला रिपब्लिकन पुढाऱ्यांनी स्वतःच्या "प्रायव्हेट रिपब्लिकन पार्टी'चे रूप दिले. बाबासाहेबांच्या स्वप्नाला आकार देण्यासाठी सज्ज असलेल्या रिपब्लिकन पक्षाची शक्ती उद्‌ध्वस्त करण्यात रिपब्लिकन पुढाऱ्यांचा तसेच जनतेचाही मोठा हात आहे. विदर्भात सुमारे 35 लाखावर आंबेडकरी मतदार आहेत. परंतु, विविध रिपब्लिकन गटातटांत विभक्तपणे लढलेल्या उमेदवारांच्या पेटीतून ही शक्ती मागील 20 वर्षांत कधीच दिसली नाही. अलीकडे भारिपाचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांच्या अकोला पॅटर्नने "वंचित'चे रूप धारण केले. यामुळे त्यांच्याकडून रिपब्लिकन शक्ती आकाराला येईल, याची अपेक्षा न केलेली बरी. दादासाहेब गायकवाडापासून तर बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे यांच्या काळात पक्षाचे चिन्ह "गजराज' अर्थात "हत्ती' होते. हत्तीवर स्वार विदर्भातील प्रत्येक रिपब्लिकन उमेदवार दीड, दोन लाखाच्या मतांचा धनी होता.
स्वार्थाचे गॅंगरीन
पंचेचाळीस वर्षे कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेसची सोबत करणाऱ्या रिपाइंने अलीकडे भाजप-सेनेसारख्या पक्षासोबत तडजोड करण्याचा द्रोह केला. स्वार्थाचे गॅंगरीन या रिपब्लिकन पुढाऱ्यांना झाले. यामुळेच निवडणुकीच्या बॅलेटपेपरवरून रिपाइं नावच गायब झाले. निवडणुकीत रिपब्लिकन मतांची वजाबाकी होऊ लागली. एकेकाळच्या "पॅंथर'ने शिवसेना-भाजपशी हातमिळवणी केली.
रिपब्लिकन पक्ष आजच्या घडीला राजकारणातील आपले स्थान शोधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. ते स्थान किंवा अस्तित्व त्यांना परत मिळेलच याची आशा धूसर आहे. मात्र, रिपब्लिकन विचारधारा न संपणारी आहे. बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान हाच रिपब्लिकन विचार म्हणून आंबेडकरी कार्यकर्ते विचारवंतांच्या धमन्यातून वाहत आहेत.
नरेश वहाणे, रिपब्लिकन मूव्हमेंट (सामाजिक संघटन), नागपूर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com