
नागपूर ः कोरोनाने अनेकांच्या आयुष्यात विष कालवले. लाखोंचा रोजगार गेला. रेशनच्या दाण्यादाण्यासाठी किलोमीटरभर रांगेत लागलेल्या २ कोटी ४७ लाख कार्डधारकांना अन्न व नागरी पुरवठा विभागाने पुन्हा कोरोनाच्या खाईत ढकलण्याचा भयावह तेवढाच संतापजनक निर्णय घेतला आहे. चार महिन्यांपासून बंद असलेली बायोमॅट्रीक पद्धत पुन्हा सुरू केली आहे. यामुळे कार्डधारक आणि दुकानदारांना मोठ्याप्रमाणात कोरोना होण्याची भीती आहे.
कोरोनामुळे राज्यात मृतांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढत आहे. तर कोरोनाबाधितांची संख्याही राज्यात आठ लाखांवर पोहोचली आहे. कोरोनामुळे लाखो लोकांचे रोजगार गेले. अचानक झालेल्या लॉकडाउनमुळे हजारो लोक अन्नपाण्यावाचून रस्त्यावर तडफडायला लागले. चप्पल फाटून पायाला भेगा पडेपर्यंत लोकांना त्रास झाला. काहींना चारशे ते पाचशे किलोमीटरपर्यंत पायी चालून घर जवळ केले. गावात गेल्यानंतर त्यांना आधार मिळाला तो गावातील सरकारी स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा. कोरोनापासून दूर राहण्यासाठी गेलेल्या मजुरांना पुन्हा सरकारच्या एका निर्णयामुळे कोरोनाला जवळ करावे लागणार आहे. सरकारी स्वस्त धान्य दुकानात गेल्या चार महिन्यांपासून बायोमॅट्रीक पद्धत बंद करण्यात आली होती. १ ऑगस्टपासून बायोमॅट्रीक पद्धत सुरू केली. अंगठा लावल्यानंतरच धान्य मिळत आहे. राज्यात २ कोटी ४७ लाख रेशनधारकांना धान्य मिळत आहे. यात कोरोनाच्या काळात ३ लाखापेक्षा अधिक ग्राहकांची तात्पुरती नोंद करण्यात आली. तर राज्यात ५५ हजार रेशन दुकानदार आहेत. त्यांच्यासोबत एक लाखांपेक्षा अधिक कर्मचारी आहेत. आत्ता या सर्वांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे.
अंगठा नाही तर धान्य नाही
अंगठा लावणे सरकारने बंधनकारक केल्याने आत्ता अंगठा लावल्याशिवाय धान्य मिळणार नाही. कोरोना होण्याच्या भीतीने हजारो कार्डधारक धान्याची उचल करणार नाही, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे गरीब मजुरांना उपाशी राहण्याची वेळ या निर्णयामुळे येऊ शकते.
रेशन दुकानदारांकडून धान्याचा भ्रष्टाचार
बायोमॅट्रीक बंद झाल्याचा फायदा घेत अनेक रेशन दुकानदारांनी ग्राहकांना धान्य कमी दिले. हा प्रकार उजेडात आल्यानंतर काहींवर गुन्हे दाखल करण्यात आले. धान्य वाटपात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने यात दुकानदारांनी लाखो रुपयांची माया जमविली. यात अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती आहे.
सुविधांचा अभाव
रेशन दुकानात सॅनिटायझर आणि इतर सुविधांचा अभाव असल्याने कोरोना वाढण्याचे धोका आहे. दुकानदार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नागपूर शहरातील काही दुकानदार मशीनवर अंगठा घेताना सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याचे पुढे आले आहे. ग्रामीण भागातही सुविधांअभावी कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.
सरकारचा हा निर्णय चुकीचा आहे. याविरोधात अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांना निवेदन दिले आहे. सरकारने लोकांच्या आयुष्याशी खेळू नये, अशी आमची मागणी आहे.
-आर.एस. आंबुलकर,(सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी) जागृती नागरिक मंच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.