समाधानाचे मोल पैशात नाही

गडचिरोली ः जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण महिलेच्या घरी जाऊन तपासणी करताना डॉ. मयूर भानारकर.
गडचिरोली ः जिल्ह्यातील ग्रामीण भागात रुग्ण महिलेच्या घरी जाऊन तपासणी करताना डॉ. मयूर भानारकर.

नागपूर ः नागपुरातला तरुण गडचिरोलीतील ग्रामीण भागात जातो. फिरत्या पथकाच्या माध्यमातून रुग्णांवर उपचार करतो. त्याची मानसिक रुग्णाशी गाठ पडते. उपचारानंतर मानसिक रोगतज्ज्ञाच्या माध्यमातून रुग्ण बरा होतो. तो बोलताना पाहून मिळणारे समाधान पैशात मोजता येत नाही. हीच खरी रुग्णसेवा असल्याची भावना व्यक्त करतो.

या तरुणाचे नाव डॉ. मयूर भानारकर. ते मूळचे नागपूरचे. शहरात इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण झाले. मुंबईतील केईएम रुग्णालयातून एमबीबीएस केले. महाविद्यालयात क्रिकेट टिमचे नेतृत्व केले. मुंबईतील गरिबांच्या शिक्षणासाठी "वेक्‍टर' हा उपक्रम सुरू केला. तसेच मेक अ डिफरन्स संस्थेच्या माध्यमातून स्वयंसेवक म्हणून काम केले. तिथून व्यवस्थापन काय असते, ते त्यांना शिकायला मिळाले असे ते म्हणतात. सर्चच्या मॉं दंतेश्‍वरी फिरत्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले. धानोरा तालुक्‍यातील 58 आदिवासी गावे, सहा आश्रमशाळा यांना ते त्यांच्या सात जणांच्या टिमसह आरोग्यसेवा देतात.

असेच एकदा डॉ. मयूर हे रिंगाटोला येथे फिरत्या पथकासोबत रुग्णांवर उपचार करण्यासाठी गेले. एक मानसिक रुग्ण आला. त्याला बोलताना त्रास व्हायचा. त्यामुळे तो शिव्या देतो, चिडचिड करतो, अशी घरच्यांची तक्रार होती. त्याला तज्ज्ञ मानसोपचाराकडे दाखविण्याचा सल्ला डॉ. मयूर यांनी दिला. त्या रुग्णाला घेऊन ते 25 किमी अंतरावरील डॉ. आरती बंग यांच्याकडे गेले. डॉ. बंग यांनी उपचार करत त्याला बरे केले. रुग्ण व्यवस्थित बोलू लागला. मी आता घरी जातो म्हणू लागला. त्यावेळी त्याच्या आणि त्याच्या नातेवाइकांच्या चेहऱ्यावरील भाव टिपण्याजोगा होता. दोघेही आनंदी होते. ते पाहून झालेले समाधान पैशात मोजता येत नाही, अशी भावना डॉ. मयूर यांनी व्यक्त केली. हीच खरी समाधानाची शिदोरी असल्याचे ते म्हणाले.

फिरते पथक नियंत्रणासाठी उपयुक्त
आदिवासी भागात रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊ शकत नाहीत. बी. पी., शूगरच्या गोळ्या घरपोच मिळाल्यास त्यांना बरे वाटते. डासांपासून होणारे आजार जास्त प्रमाणात आहेत. त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम फिरत्या पथकाच्या माध्यमातून करता येत असल्याचे डॉ. मयूर म्हणाले.

वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर मी कुणासाठी काम करणार हे ठरविणे आवश्‍यक आहे. स्पेशलायझेशन कशात करावं हे आपण कोणत्या लोकांसाठी काम करायचे आहे त्यानुसार ठरवलं पाहिजे.
- डॉ. मयूर भानारकर, वैद्यकीय अधिकारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com